Pune News : लोणी काळभोर, ता. 9 : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक कोंडी इतकी भीषण झाली आहे की, नागरिकांच्या सहनशीलतेचा अंत होताना दिसत आहे. दररोज तासन्तास वाहनांच्या रांगा, प्रचंड विलंब, धूळ-प्रदूषण आणि मानसिक ताण यांचा सामना करत प्रवासी अक्षरशः हैराण झाले आहेत. मात्र, एवढ्या गंभीर परिस्थितीतही वाहतूक नियंत्रणासाठी जबाबदार असलेली पुणे शहर पोलीस यंत्रणा निष्क्रिय असल्याचे चित्र समोर येत आहे.

दरम्यान, लोणी स्टेशन चौकातील परिस्थिती अत्यंत चिंताजनक बनली आहे. येथे वाहतूक पोलीस क्वचितच कर्तव्य बजावताना दिसतात. त्यामुळे “लोणी स्टेशन चौकात पोलीस पूर्णवेळ कर्तव्य बजावत असल्याचे आम्हाला कळवा आणि रोख रकमेचे बक्षीस मिळवा,” अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. या चौकात पोलीस कधीही येतात आणि कधीही निघून जातात, त्यामुळे सरकारला अशा प्रकारची योजना राबवावी लागणार नाही ना, असा संतप्त सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील हडपसर गाडीतळ, मांजरी फार्म, कवडीपाट टोलनाका, लोणी स्टेशन चौक, एमआयटी कॉर्नर, थेऊर फाटा आणि कुंजीरवाडी (नायगाव चौक) या प्रमुख ठिकाणी दररोज प्रचंड वाहतूक कोंडी होत असून, वाहनांच्या 3 ते 4 किलोमीटरपर्यंत लांब रांगा लागतात. यामुळे कामावर जाणारे कर्मचारी, विद्यार्थी, व्यावसायिक तसेच रुग्णवाहिकांनाही मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. आपत्कालीन सेवांवरही याचा गंभीर परिणाम होत असल्याने परिस्थिती अधिकच भयावह बनली आहे.
एकीकडे वाहतूक नियंत्रणाचा पूर्ण बोजवारा उडालेला असताना, दुसरीकडे काही ठिकाणी पोलीस कारवाईच्या नावाखाली केवळ पावत्या फाडण्यात आणि वसुलीतच व्यस्त असल्याचे चित्र दिसून येत आहे. दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई केली जात असली, तरी अवैध वाहतूक तसेच रस्त्यावर अडथळा निर्माण करून थांबणाऱ्या रिक्षांवर मात्र कारवाई होत नसल्याची तक्रार आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत होण्याऐवजी नागरिकांच्या अडचणींमध्ये अधिक भर पडत आहे.
“वाहतूक पोलिसांनी आपली जबाबदारी विसरली आहे का?” असा थेट सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. केवळ कागदी कारवाई आणि दंडात्मक मोहिमा राबवून वाहतूक समस्या सुटणार नाहीत, याची जाणीव प्रशासनाने ठेवणे आवश्यक आहे. “आधी कोंडी सोडवा, मग दंड करा,” अशी स्पष्ट मागणी नागरिकांनी केली आहे.
दरम्यान, वाहतूक पोलीस चौकात नियमितपणे उपस्थित नसल्याने पुणे–सोलापूर महामार्गावरील वाहतुकीची पूर्णपणे विस्कळीत अवस्था झाली आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांनी तत्काळ रस्त्यावर उतरून नियोजनबद्ध पद्धतीने वाहतूक सुरळीत करावी, अन्यथा नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास पूर्णपणे ढासळू शकतो. प्रशासन आता तरी जागे होणार का, की ‘कोंडी’ हीच लोणी काळभोरची ओळख बनणार, असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी पुणे शहर वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव व हडपसर वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी फोन न उचलल्याने त्यांची प्रतिक्रिया समजू शकली नाही.
पोलीस प्रशासनाला जाग येणार का?
लोणी स्टेशन चौकात एक नामांकित इंग्रजी माध्यमाची शाळा आहे. ही शाळा दुपारी सुमारे अडीच वाजता सुटते. त्यानंतर विद्यार्थी सोलापूर महामार्ग ओलांडण्यासाठी चौकात येतात. अशावेळी तेथे वाहतूक पोलीस उपस्थित असणे अत्यंत आवश्यक आहे. मात्र, प्रत्यक्षात पोलीस नसल्याने विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून रस्ता ओलांडावा लागत आहे. एखादा मोठा अपघात घडल्यानंतरच पोलीस प्रशासनाला जाग येणार का, असा गंभीर सवाल लोणी काळभोर ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.






