Pune News: उरुळी कांचन, (पुणे) : स्वामी विवेकानंद प्रतिष्ठान संचलित स्वामी विवेकानंद विद्यालय (माध्यमिक विभाग) व बालवाडी यांचे वार्षिक स्नेहसंमेलन अत्यंत उत्साहपूर्ण, शिस्तबद्ध व सांस्कृतिक वैभवाने परिपूर्ण वातावरणात “स्वामिनी” या प्रेरणादायी संकल्पनेवर मोठ्या दिमाखात नुकतेच पार पडले. Pune News

“स्वामिनी” ही संकल्पना स्वावलंबन, आत्मबळ, नेतृत्वगुण, नैतिक मूल्ये व सामाजिक जबाबदारी यांचे प्रतीक असून विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्य, नाट्य व गीतांमधून कर्तव्यनिष्ठा, धैर्य, शिस्त, सेवा, देशप्रेम व संस्कार यांचे प्रभावी दर्शन घडले. बालवाडीतील चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त व मनोरंजक सादरीकरणांनी उपस्थितांची मने जिंकली. प्रत्येक सादरीकरणातून विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास, सृजनशीलता व संघभावना ठळकपणे दिसून आली.
या स्नेहसंमेलनास प्रमुख पाहुणे व कार्यक्रमाध्यक्ष प्रदीप कुंभार, संस्थाध्यक्ष सुरेश कांचन, उपाध्यक्ष सुरेश सातव, सचिव पंडित कांचन, खजिनदार प्रकाश कांचन यांच्यासह विश्वस्त रवींद्र बडेकर, संभाजी कांचन, कमलाकर अहिनवे, इंद्रभान धुमाळ, अक्षय कांचन व साहेबराव कांचन यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर म्हणून उन्नती कन्या विद्यालयाच्या संचालिका डॉ. नुपूर कांचन, स्वामी विवेकानंद अकॅडमीचे प्राचार्य सुमित दास तसेच स्वामी विवेकानंद विद्यालय (प्राथमिक विभाग) यांच्या मुख्याध्यापिका सरिता राऊत यांनीही कार्यक्रमास उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली. कार्यक्रमाध्यक्ष प्रदीप कुंभार यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात “स्वामिनी” संकल्पनेवर आधारित सांस्कृतिक सादरीकरणांचे विशेष कौतुक करत विद्यार्थ्यांनी दिलेल्या सामाजिक व नैतिक संदेशांचे अभिनंदन केले.
मुख्याध्यापिका उज्ज्वला साळुंके यांनी वार्षिक अहवाल सादर करताना शाळेने सलग 9 वर्षे इयत्ता दहावीचा 100 टक्के निकाल प्राप्त केल्याची माहिती दिली. शैक्षणिक नियोजन, नियमित मूल्यमापन, वैयक्तिक मार्गदर्शन, पालक–शिक्षक समन्वय व शिक्षकवृंदाच्या अथक परिश्रमांमुळे हे यश साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. बालवाडी व माध्यमिक विभागातील शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक, सांस्कृतिक व नैतिक विकासासाठी केलेल्या परिश्रमांचेही त्यांनी विशेष उल्लेख केला. यावेळी इंद्रभान धुमाळ यांनी शिक्षक व विद्यार्थ्यांच्या मेहनतीचे कौतुक करत स्नेहसंमेलनाचे अत्यंत प्रभावी व शिस्तबद्ध आयोजन केल्याबद्दल संस्थेचे अभिनंदन केले.
दरम्यान, संपूर्ण स्नेहसंमेलन आनंददायी व संस्मरणीय वातावरणात संपन्न झाले. हा कार्यक्रम शाळेच्या सर्वांगीण विकास, मूल्याधिष्ठित शिक्षण व शिस्तप्रिय संस्कारांची उज्ज्वल साक्ष देणारा ठरला असून स्वामी विवेकानंद विद्यालय (माध्यमिक विभाग) व बालवाडीच्या शैक्षणिक वाटचालीतील एक अभिमानास्पद टप्पा ठरला






