Pune Crime : लोणी काळभोर, ता. 26 : कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील ग्रामदैवत कालभैरवनाथ यात्रेत बुधवारी (ता. 25) रात्री चोरट्यांनी अक्षरशः धुमाकूळ घालत महिला, लहान मुले व तरुणांच्या गळ्यातील चैन अशा अंदाजे 8 पेक्षा जास्त नागरिकांच्या सुमारे 10 तोळ्यांहून अधिक सोन्या-चांदीच्या दागिन्यांवर डल्ला मारल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून लोणी काळभोर पोलीस प्रशासनाच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहेत.

यात्रेनिमित्त पंचक्रोशीतील हजारो भाविक दर्शनासाठी दाखल झाले होते. गर्दीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र, गंठण, पर्स, लहान मुलांच्या गळ्यातील सोन्याचे बदाम व कानातले, तसेच तरुणांच्या गळ्यातील सोनसाखळ्या क्षणार्धात लंपास केल्या. काही महिलांना दागिने चोरीला गेल्याचे समजताच त्यांना धक्का बसला, तर काहींनी रडारड करत घटनास्थळीच संताप व्यक्त केला.
विशेष म्हणजे, यापूर्वीही कुंजीरवाडीतील काही मंगल कार्यालयांमध्ये चोरीच्या घटना घडल्या होत्या. तरीदेखील यात्रेसारख्या मोठ्या धार्मिक कार्यक्रमासाठी पुरेसा पोलीस बंदोबस्त न ठेवणे ही गंभीर बाब मानली जात आहे. ग्रामपंचायतीने यात्रेबाबतची पूर्वसूचना लोणी काळभोर पोलिसांना दिली होती, असे सांगितले जाते. मात्र, प्रत्यक्षात प्रभावी बंदोबस्त दिसून आला नाही, अशी नागरिकांमध्ये जोरदार चर्चा आहे.
कुंजीरवाडीचे सरपंच हरेश गोठे यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना सांगितले, “ग्रामपंचायतीने सर्व तयारी केली होती. यात्रेची माहितीही पोलिसांना देण्यात आली होती. मात्र, प्रत्यक्षात बंदोबस्त नव्हता. काही पोलीस येत-जात होते, पण गर्दीत थांबून नियंत्रण ठेवण्याचे काम झाले नाही. पोलीस ठाण मांडून उभे राहिले असते, तर इतक्या मोठ्या प्रमाणात चोऱ्या झाल्या नसत्या.”
यात्रेत ज्यांचे दागिने चोरीला गेले आहेत, त्या सर्वांना एकत्र घेऊन आज दुपारी तीनच्या सुमारास लोणी काळभोर पोलीस ठाण्यात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. यात्रेत महिलांपासून लहान मुलांपर्यंत सर्वांनाच लक्ष्य करण्यात आल्याने ही टोळी सराईत असून नियोजनबद्ध पद्धतीने चोऱ्या करण्यात आल्या असाव्यात, अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. पोलिसांकडे संबंधित चोरट्यांचा तातडीने शोध घेऊन कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सरपंच गोठे यांनी सांगितले.
दरम्यान, लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत असून वारंवार घडणाऱ्या चोऱ्यांमुळे नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास डळमळीत होत असल्याची भावना व्यक्त होत आहे. यात्रेसारख्या धार्मिक आणि सार्वजनिक कार्यक्रमातच जर नागरिक असुरक्षित असतील, तर सामान्य दिवसांत काय परिस्थिती असेल, असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे.
“कुंजीरवाडी येथील यात्रेदरम्यान पोलिसांचा आवश्यक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. गर्दीत काही चोरट्यांनी दागिने चोरी केल्याची माहिती मिळत आहे. मात्र, अद्यापपर्यंत या संदर्भात कोणतीही अधिकृत तक्रार पोलीस ठाण्यात दाखल झालेली नाही. तक्रार प्राप्त झाल्यानंतर गुन्हा नोंदवून संबंधित चोरट्यांचा शोध घेऊन त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.”
राजेंद्र पन्हाळे (वरिष्ठ पोलीस निरीक्षक – लोणी काळभोर पोलीस ठाणे)






