Pune Crime : पुणे: पुण्यातील लोणीकंद परिसरातून एक अत्यंत हृदयद्रावक घटना समोर आली असून लग्नाला केवळ 8 महिने पूर्ण होण्याआधीच एका 22 वर्षीय विवाहितेने आपले जीवन संपवले आहे. वैष्णवी लाटे असे या तरुणीचे नाव आहे. हुंड्यासाठी आणि पैशांच्या हव्यासापोटी सासरच्या मंडळींनी केलेल्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचे पाऊल उचलल्याचा आरोप तिच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी पतीसह सासू आणि सासऱ्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

वैष्णवीचे लग्न 11 मार्च 2025 रोजी यशवंत लाटे याच्याशी ठरले होते. लग्न ठरल्यापासूनच सासरच्या मंडळींकडून पैशांची मागणी सुरू झाल्याचे समजते. सुरुवातीला नवीन घराच्या फर्निचरसाठी 2 लाख रुपयांची मागणी करण्यात आली होती, जी वैष्णवीच्या माहेरच्यांनी पूर्ण केली होती. त्यानंतर 7 मे रोजी मोठ्या थाटामाटात लग्न पार पडले. लग्नातही मानपान आणि संसारासाठी आवश्यक असलेल्या सर्व वस्तू देण्यात आल्या होत्या. मात्र, लग्नानंतर काही दिवसातच वैष्णवीचा छळ सुरू झाला.
वैष्णवीला तिचा पती यशवंत याचे दुसऱ्या मुलीसोबतचे चॅटिंग सापडले होते. तिने याबद्दल जाब विचारला असता तिला मारहाण करून माहेरी पाठवून देण्यात आले. त्यानंतर तिला पुन्हा नांदवण्यासाठी 5 लाख रुपये आणि चारचाकी गाडीची मागणी करण्यात आली. मुलीचा संसार वाचावा या हेतूने तिच्या पालकांनी 17 जानेवारी 2026 रोजी 5 लाख रुपये रोख दिले होते. तरीही सासरच्यांचे समाधान झाले नाही. आता घराच्या सजावटीसाठी म्हणजेच इंटेरियरसाठी पुन्हा 20 लाख रुपयांची मागणी करण्यात येत होती.
पैसे आणले नाही तर तोंड दाखवू नकोस, अशी धमकी पतीने दिल्याचे वैष्णवीने आपल्या आईला फोनवरून सांगितले होते. यानंतर तिचे कुटुंबीय तिला भेटायला सासरी गेले असता, पैसे न मिळाल्यास मुलाचे दुसरे लग्न लावून देऊ, अशी धमकी सासरच्यांनी दिली. आई भेटून गेल्यानंतर दुसऱ्याच दिवशी वैष्णवीने राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. या घटनेमुळे परिसरात संताप व्यक्त होत असून पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.







