पुणे: राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या (Jayant Patil) निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही गटांच्या भवितव्याबाबत राजकीय वर्तुळात मोठ्या प्रमाणावर (Ajit Pawar Death) चर्चा रंगली होती. विशेषत: दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे विलिनीकरण होणार का, हा प्रश्न सातत्याने उपस्थित केला जात होता. अजित पवार जिवंत असताना त्यांनी दोन्ही गट एकत्र यावेत, यासाठी प्रयत्न केले होते, असा दावा शरद पवार गटातील काही नेत्यांकडून करण्यात आला होता. मात्र (Sunetra Pawar) अजित पवार गटाचे प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांनी अशी कोणतीही अधिकृत चर्चा झालेली नसल्याचे स्पष्ट करत हा दावा फेटाळून लावला. त्यामुळे काही दिवसांपासून रंगलेली विलिनीकरणाची चर्चा आता मंदावल्याचे चित्र दिसत आहे. (Maharashtra Politics)

याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटाचे ज्येष्ठ नेते आणि आमदार जयंत पाटील यांनी महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. विलिनीकरणाच्या प्रश्नावर भाष्य करण्याचे त्यांनी टाळले असले तरी सुनेत्रा पवार यांना आवश्यक तेव्हा मदत करण्याची तयारी दर्शवली आहे. “विलिनीकरणावर बोलणे योग्य नाही. आमचा पक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्रपणे कार्यरत आहे आणि पुढेही तसेच राहील,” असे स्पष्ट करत त्यांनी पक्षाचे स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित केले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, अजित पवार यांच्या निधनानंतर ते काही सहकाऱ्यांसह बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या घरी भेटायला गेले होते. त्यावेळी “काही अडचण असेल तर आम्ही मदतीला आहोत,” असा संदेश त्यांनी दिला. सुनेत्रा पवार किंवा पार्थ पवार यांच्या वाटेत अडथळे निर्माण करण्याची आमची कोणतीही इच्छा नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
राजकारणात परिस्थिती क्षणाक्षणाला बदलते, आज काय ठरेल ते उद्या बदलू शकते, असे म्हणत पाटील यांनी सावध भूमिका घेतली. शेतकऱ्यांपुढील आव्हाने, देशातील आर्थिक परिस्थिती आणि इतर महत्त्वाचे प्रश्न यांवर लक्ष केंद्रित करणे गरजेचे असल्याचे ते म्हणाले. विलिनीकरणाच्या चर्चेपेक्षा सध्याच्या सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर काम करणे हेच पक्षाचे प्राधान्य असल्याचे त्यांच्या वक्तव्यातून स्पष्ट झाले.







