लोणी काळभोर, ता. २4 : पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर स्वारगेट ते उरुळी कांचन या दरम्यान वाहतूक कोंडी ही नित्याची बाब झाली आहे. चौकाचौकात वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी पोलिसांच्या नेमणुका करण्यात आलेल्या आहेत. मात्र त्याऐवजी ते ये-जा करणारे शेतकरी, नोकरदार व सर्वसामान्य नागरिकांकडून पठाणी वसुली करीत असल्याच्या तक्रारी येत असून वाहतूक विभागातील पोलिसांचे काम वाहतूक नियमन की वसुली असा प्रश्न वाहनचालकांना पडला आहे.

पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वारगेट चौक, सेवन लव्ह चौक, पुलगेट,रेस कोर्स सर्कल, हडपसर गाडीतळ, 15 नंबर चौक, कवडीपाट टोलनाका ते उरुळी कांचन ग्रामपंचायत हद्दीतील तळवाडी चौक यादरम्यान दररोज प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. मात्र, सध्या वाहतूक शाखेचे पोलीस वाहतूक कोंडी सोडविण्याऐवजी ऑनलाईन दंड व पावत्या फाडण्यात दंग आहेत. त्यामुळे सोलापूर, लातूर, दौंड, यवत, इंदापूर परिसरातून येणाऱ्या दुचाकी, चारचाकी सह अवजड वाहने येणाऱ्या जाणाऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे.
मार्च एन्ड जवळ आल्याने सध्या वाहतूक पोलिसांकडून पुणे-सोलापूर महामार्गावरील स्वारगेट ते उरुळी कांचन दरम्यानच्या अनेक चौकामध्ये दररोज सर्रासपणे वसुली सुरूच असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सदरची कारवाई आणि वाहन तपासणी मोहिमेत विना परवाना वाहन चालविणे, कागदपत्रे जवळ नसणे, ट्रिपल सीट, सीट बेल्ट न लावणे, पीयूसी प्रमाणपत्र नसणे आदी नेहमीच्याच सुमार आणि ढोबळ कारणांसाठी ठरलेली 500 ते 1500 रुपयांपर्यंत पावती फाडत आहेत. त्यातून सामान्यांना मात्र विनाकारण त्रास होत असून राजकीय पक्षाचा लोगो लावलेल्या गाड्या, काळ्या काचा लावलेल्या आणि सर्रास नियमभंग करणाऱ्या उच्चभ्रूंच्या चारचाकी, सरकारी कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या गाड्या अशी वाहने मात्र सहीसलामत पावतीतून सुटत असल्याचा अनेकांचा अनुभव आहे.
दुसरीकडे सर्वसामान्य वाहनधारकांना वाहतुक शाखेचे पोलिस कर्मचारी वाहनांचा फोटो काढून मोठा दंड आकारत आहेत. प्रसंगी अनेक वाहनधारकांना हुज्जत घालून अपमानीत करत आहेत. विशेष म्हणजे यात अनेक वाहनधारकांची कुठलीही चूक नसताना हा आर्थिक फटका त्यांना नाहक सहन करावा लागत आहे. रस्त्यावर एका बाजूला उभे राहून वाहतूक पोलीस सर्वसाधारण वाहनधारकांना हेरुन ते समोर जाताच अचानक त्यांच्या वाहनाचा फोटो काढून मोठा दंड आकारतात असा अनुभव सध्या अनेकांना दररोज येत असल्याचा तक्रारी आहेत.
वाहतुक नियमनाकडे दुर्लक्ष?
पुणे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर दैनंदिन छोटे मोठे अपघात होत असतात. रस्त्याची दुरवस्था व वाहतूक कोंडी याचा अगोदरच नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे. त्यातच वाहतूक पोलिसांनी वसुलीचे टार्गेट पूर्ण करण्याच्या नावाखाली वाहतूक नियमनाकडे मात्र सपशेल दुर्लक्ष केल्याचे दिसून येत आहे. कवडी पाट टोलनाक्यांच्या आजूबाजूला घोळक्याने उभे असलेले पोलिस रस्त्याच्या मध्यभागी येऊन वाहने अडवत वसुली करत आहेत. त्यातून अनेकांना वाहनचालकांची घाबरगुंडी उडते आणि त्यांच्या अपघाताची शक्यता वाढते.
‘वसूली’ कर्मचाऱ्यावर कारवाई होणार का?
दरम्यान मार्च एन्डच्या नावाखाली होणारी दंडात्मक कारवाई अनेकदा ‘तोडपाणी’ करून प्रकरण मिटविण्यातच खर्च होते असा वाहनचालकांचा अनुभव आहे. त्यातून सरकारी तिजोरी कमी आणि आपला खिसा जास्त भरण्याचा प्रकार होत असल्याचा नागरिकांचा आणि वाहनचालकांचा आरोप आहे. असे भ्रष्ट वाहतूक पोलिस आपल्या खात्याच्या नावाखाली स्वतःचीच तुंबडी भरत असल्याचे वास्तव अनेक ठिकाणी दिसून येत आहे. एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच वाहतूक पोलिस व त्यांचे वरिष्ठ अधिकारी जागे होणार का? व या ‘वसूली’ कर्मचाऱ्यावर प्रशासनाच्या वतीने काय कारवाई होणार ? याकडे सामान्य पुणेकरांचे लक्ष लागले आहे.







