प्रतिनिधी सागर घरत

Karmala Election: करमाळा: करमाळा नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीत सावंत गटाने जोरदार मुसंडी मारत नगराध्यक्ष पदासह बहुमत मिळवले आहे. सावंत गटाच्या सौ. मोहिनीताई संजय (पप्पू) सावंत यांनी भाजपच्या सुनिता देवी यांचा तब्बल १८३१ मतांनी पराभव करत नगराध्यक्षा पदावर विजय मिळवला. या निवडणुकीत सावंत गटाचे एकूण आठ नगरसेवक निवडून आले असून नगराध्यक्षा धरून संख्या ८+१ झाली आहे.
निवडणुकीनंतर प्रतिक्रिया देताना सावंत गटाचे नेते सुनील बापू सावंत यांनी हा विजय “धनशक्तीविरुद्ध जनशक्तीचा विजय” असल्याचे सांगितले. निवडणुकीनंतर सावंत गट भाजपमध्ये प्रवेश करणार, या चर्चांवर बोलताना ते म्हणाले, “आमचा एकच पक्ष आहे आणि तो म्हणजे जनतेचा पक्ष.” अशी सावध प्रतिक्रिया त्यांनी दिली.
या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाकडे मुख्यमंत्री, पालकमंत्री आणि मोठी राजकीय यंत्रणा असूनही अपेक्षित यश मिळू शकले नाही. पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी करमाळा नगर परिषद ‘दत्तक’ घेतल्याची घोषणा केली होती, मात्र तरीही भाजपला नगराध्यक्ष पदासह अनेक जागांवर पराभव स्वीकारावा लागला. यामुळे भाजपसाठी ही निवडणूक आत्मचिंतनाची ठरल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
दरम्यान, शिवसेनेला या निवडणुकीत मोठा धक्का बसला आहे. शिवसेना नेते माजी आमदार जयवंतराव जगताप यांच्या पत्नी नंदिनीदेवी जगताप यांचा पराभव झाला. तसेच त्यांचे पुत्र, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप हे देखील नगरसेवक पदाच्या निवडणुकीत पराभूत झाले. विशेष म्हणजे, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जगताप यांच्यासाठी विजयाचे आव्हान दिले होते, तरीही शिवसेनेला अपेक्षित यश मिळाले नाही.
नगरपरिषदेतील पक्षनिहाय संख्या
सावंत गट : ८ + १ (नगराध्यक्षा)
भाजप : ७
शिवसेना : ५
प्रमुख पराभव
या निवडणुकीत भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, माजी नगराध्यक्ष शौकत नालबंद, माजी नगरसेवक राहुल जगताप, माजी नगराध्यक्ष वैभव जगताप, तसेच अनेक माजी नगरसेवक व प्रमुख नेत्यांच्या कुटुंबीयांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यामुळे सर्वच राजकीय जाणकारांचे अंदाज फोल ठरले आहेत.
करमाळा नगर परिषद निवडणूक निकालाने जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता असून, येत्या काळात स्थानिक राजकारणात नव्या घडामोडींना वेग येण्याची चिन्हे दिसत आहेत






