आदित्य बोराटे

Indapur : पवित्र रमजान महिन्याची सुरुवात दि. १९ फेब्रुवारीपासून होताच बाजारपेठेत चैतन्याचे वातावरण निर्माण झाले असून फळे, खजूर, बेकरी पदार्थ व विशेष रमजान खाद्यपदार्थांना मोठी मागणी वाढली आहे. रोजाच्या पार्श्वभूमीवर ग्राहकांची गर्दी वाढत असून व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येत आहे.
यंदा खजूरांच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहे. आजवा खजूर १२०० रुपये किलो, कलमी खजूर १००० रुपये किलो दराने विक्री होत असून इतर खजूर ३०० ते १२०० रुपये किलोपर्यंत गुणवत्तेनुसार उपलब्ध आहेत. साधी पेंड खजूर १५० रुपये किलो दराने विक्री होत आहे, तर अरब पेंड २४० रुपये किलो दराने विक्री होत असल्याची माहिती विक्रेते निहाल बागवान यांनी दिली.
रमजानमध्ये खरबूज, कलिंगड, केळी, सफरचंद या फळांना विशेष मागणी वाढली आहे. त्याचबरोबर खारी, टोस्ट यांसारख्या बेकरी पदार्थांची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. इफ्तारसाठी लागणाऱ्या खिचडा रॉ मटेरियलचा दर १२० रुपये किलो आहे.
तसेच बासुंदी खीर, फिस्ता फालुदा, मँगो, खजूर रबडी, स्ट्रॉबेरी मसाला, बदाम खीर, अंगूर रबडी मसाला, अंगूर रबडी, सीताफळ रबडी हे तयार पदार्थ २०० ग्रॅमसाठी १३० रुपये दराने उपलब्ध असून १६० ते २५० रुपयांपर्यंत विविध पॅकेट्स उपलब्ध आहेत. रु हब्जा व सब्जा यांनाही मोठी मागणी असल्याचे बागवान प्री फूड्सचे मालक फिरोज बागवान यांनी सांगितले.एकूणच रमजानच्या निमित्ताने बाजारपेठ गजबजली असून व्यापाऱ्यांच्या व्यवसायाला चांगली चालना मिळत आहे.






