HSC SSC Exam 2026 : दहावी-बारावीच्या परीक्षांचा काळ म्हणजे लाखो विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा टप्पा. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने घेण्यात येणाऱ्या या परीक्षांमध्ये कोणताही गैरप्रकार, अफवा किंवा अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासनाने यंदा अधिक कडक पावले उचलली आहेत. त्याच पार्श्वभूमीवर पुणे ग्रामीण जिल्ह्यातील सर्व परीक्षा केंद्रांभोवती तब्बल 100 मीटरच्या परिसरात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत.

बारावीच्या परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च, तर दहावीच्या परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च दरम्यान होणार आहेत. या कालावधीत परीक्षा केंद्रांच्या आसपास अनधिकृत व्यक्तींना प्रवेश दिला जाणार नाही. केवळ परीक्षार्थी विद्यार्थी, परीक्षा कामासाठी नेमलेले अधिकारी-कर्मचारी, पोलीस आणि सुरक्षा कर्मचारी यांनाच या परिसरात प्रवेशाची परवानगी असेल.
महत्त्वाचे म्हणजे, परीक्षा केंद्रांच्या 100 मीटर परिसरात दोन किंवा त्याहून अधिक व्यक्तींनी एकत्र येण्यासही बंदी घालण्यात आली आहे. यामागचा उद्देश स्पष्ट आहे-कॉपी, पेपरफुटी, दिशाभूल करणाऱ्या अफवा किंवा बाहेरील हस्तक्षेप यांना पूर्णपणे आळा घालणे.
याशिवाय, या परिसरात झेरॉक्स सेंटर, इंटरनेट कॅफे, ई-मेल सेवा, एसटीडी-आयएसडी बूथ यांसारखी सुविधा तात्पुरत्या स्वरूपात बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मोबाईल फोन, कॅलक्युलेटर, लॅपटॉप, रेडिओ, वायरलेस सेट यांसारखी इलेक्ट्रॉनिक साधने जवळ बाळगणे किंवा वापरणेही पूर्णतः निषिद्ध असेल.
या नियमांचे उल्लंघन केल्यास कठोर कारवाई करण्यात येणार आहे. प्रशासनाचा हा निर्णय विद्यार्थ्यांच्या परीक्षेची विश्वासार्हता जपण्यासाठी आणि प्रामाणिक विद्यार्थ्यांवर अन्याय होऊ नये यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. विद्यार्थ्यांनी आणि पालकांनीही या नियमांची जाणीव ठेवून सहकार्य करणे, हाच यशाचा खरा मंत्र ठरणार आहे.




