पुणे : पुण्यात गणेश विसर्जनाच्या एक दिवशी आधी ५ सप्टेंबर रोजी नाना पेठ परिसरात आंदेकर टोळीने गोविंद उर्फ आयुष गणेश कोमकरची (वय १९) गोळ्या घालून हत्या केली. ही हत्या गेल्या वर्षी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक वनराज आंदेकर यांच्या खुनाचा बदला घेण्यासाठी करण्यात आली, अशी माहिती पोलिस तपासात समोर आली आहे. या प्रकरणात आंदेकर टोळीचा प्रमुख सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह एकूण १३ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी यश पाटील आणि अमित पाटोळे या दोघांना ताब्यात घेतले आहे. या अटकेनंतर आता मोठी माहिती समोर येत आहे ती म्हणजे, कोमकर आणि गायकवाड टोळी विरुद्ध आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने देखील मदत केल्याचं समोर आलं आहे.

गेल्या वर्षी कोमकर आणि सोमनाथ गायकवाड यांच्या टोळीने वनराज आंदेकर यांची कोयत्याने आणि गोळ्या घालून हत्या केली होती. या हत्येनंतर आंदेकर टोळीने बदला घेण्याचे ठरवले आणि वनराज आंदेकर यांच्या हत्येला एक वर्ष पूर्ण होताच आयुष कोमकरची हत्या करण्यात आली. आयुष्य हा गणेश कोमकरचा मुलगा आहे. जो वनराज हत्येतील मुख्य आरोपी आहे. आणि या प्रकरणी तो सध्या जेलमध्ये असून, मुलाच्या हत्येनंतर पॅरोलवर बाहेर आला आहे.
आयुषयावर हल्ला करण्याआधी आंदेकर टोळीचा प्लॅन गायकवाड टोळीवर हल्ला करण्याचा होता. आंदेकर टोळीचा सदस्य दत्ता काळे हा आंबेगाव पठार परिसरात गायकवाड गटाच्या काही सदस्यांच्या घरावर नजर ठेवून होता. मात्र, आयुष हत्येच्या चार दिवस आधी पोलिसांनी हा कट उधळून काळेला अटक केली. गायकवाड टोळीवर हल्ला करण्यासाठी आंदेकर टोळीला टिपू पठाण टोळीने मदत केल्याची माहिती आता समोर आली आहे. या हल्ल्यासाठी शस्त्रे पुरवण्याची जबाबदारी ही पठाण टोळीने घेतली होती.
वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार घाडगे यांच्या गुन्हे शाखा पथकाला माहिती मिळाली होती की, टिपू पठाण टोळीचा तालीम खान आणि युनूस हे सोमवार पेठेत शस्त्रांसह लपले आहेत. यानंतर पोलिस उपनिरीक्षक राहुल मखरे यांच्या पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. आणि त्यांच्याकडून गावठी पिस्तूल आणि काडतुसे जप्त करण्यात आली.
पोलिसांना तपासात समोर आले की, वनराज खुनातील मुख्य आरोपी सोमनाथ गायकवाड, अनिकेत दुधभाते आणि इतर सदस्यांची घरे आंबेगाव पठार परिसरात आहेत. या ठिकाणांची रेकी करून हल्ला करण्याचा प्लॅन होता, ज्यात दत्ता काळे, कृष्णा आंदेकर, अमन पठाण, यश पाटील आणि टिपू पठाण टोळीचे काही सदस्य सामील होते. काळे याने घरांची माहिती गोळा केली होती. तर कृष्णा आंदेकरने अमन पठाणला हल्ल्यासाठी बोलावले होते. त्यासाठी खोली भाड्याने घेण्यासाठी पैसेही देण्यात आले. अमन पठाणने “लक्ष ठेवा, बाहेर आला की कळवा” अशी सूचना दिली होती, असे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. पोलीस या प्रकरणाचा तपास करत असून, आंदेकर टोळीच्या निशाण्यावर आयुष्य व्यतिरिक्त आणखी कोण-कोण होते याचा शोध घेत आहेत.
दरम्यान, आयुषच्या हत्येनंतर पुण्यात पुन्हा एका टोळी युद्ध डोकं वर काढणार असल्याचं चित्र आहे. तर दुसरीकडे पोलिसांसमोर हे टोळीयुद्ध थांबवण्याचे आणि शहरात शांतता कायम ठेवण्याचे मोठे आव्हान असेल.







