Crime : दौंडजवळून धावणाऱ्या गरीबरथ एक्सप्रेसमध्ये शनिवारी (१४ तारखेला) दोन वेगवेगळ्या चोरीच्या घटना घडल्या असून, एकूण सुमारे ७ लाख रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची माहिती समोर आली आहे. या घटनांमुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

पहिली घटना नागपूर–पुणे मार्गावरील गाडीत घडली. औंध येथील जया पंकज जाजू (वय ५५) या धामणगावहून पुण्याकडे प्रवास करत होत्या. दौंड कॉर्ड लाईन स्थानक सुटल्यानंतर त्यांच्या आसनाजवळ ठेवलेली पर्स गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. पर्समध्ये सोन्या-हिऱ्याचे दागिने कानातले, हिर्याचे ब्रेसलेट, मंगळसूत्र, दोन डायमंड अंगठ्या, तीन सोन्याच्या अंगठ्या आणि रोख पाच हजार रुपये असा सुमारे ६ लाख ६० हजार रुपयांचा ऐवज होता.
दुसऱ्या घटनेत लोहगाव, पुणे येथील सचिन रमेश नगरकर (वय ४३) यांच्या बॅगेतून ७१ हजार ५०० रुपयांची रोकड आणि महत्त्वाची कागदपत्रे चोरीस गेली. दोन्ही घटना एकाच गाडीत आणि जवळपास त्याच वेळेत घडल्याने रेल्वे पोलिस तपास करत आहेत की या चोऱ्यांमागे एकाच टोळीचा हात आहे का.
जया जाजू यांनी पुणे लोहमार्ग पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल केली असून, पुढील तपासासाठी प्रकरण दौंड लोहमार्ग पोलीस ठाणेकडे वर्ग करण्यात आले आहे. सीसीटीव्ही फुटेज, सहप्रवाशांची माहिती आणि तिकीट तपासणी यांची पडताळणी सुरू आहे.
दरम्यान, रेल्वे पोलिसांनी प्रवाशांना मौल्यवान दागिने व मोठी रक्कम उघडपणे न ठेवण्याचे, बॅग साखळीने सुरक्षित बांधण्याचे आणि संशयास्पद हालचाली त्वरित टीटीई किंवा पोलिसांना कळवण्याचे आवाहन केले आहे. वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे लांब पल्ल्याच्या गाड्यांमध्ये सुरक्षाव्यवस्था अधिक कडक करण्याची मागणी होत आहे.







