Bhigwan : शहरात सध्या मॉडिफाईड सायलेन्सर बसवलेल्या दुचाकींचा त्रास असह्य झाला आहे. चौकाचौकातून वेगाने गाड्या पळवत अचानक ‘फटाकड्यासारखे’ मोठे आवाज काढण्याचे प्रकार वाढले असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः बाजारपेठ, शाळा–कॉलेज परिसर आणि मुख्य रस्त्यांवर हा प्रकार वारंवार घडत असल्याने लहान मुले, महिला व जेष्ठ नागरिक दचकून घाबरत आहेत.
अनेक ठिकाणी अल्पवयीन मुलांच्या हाती दुचाकी दिसत असून, मूळ कंपनीने दिलेल्या सायलेन्सरऐवजी जाणीवपूर्वक मोठा आवाज करणारे मॉडिफाईड सायलेन्सर बसवले जात आहेत. वेगमर्यादा न पाळणे, ट्रिपल सीट फिरणे आणि मुद्दाम ‘बार’ काढणे ही काही तरुणांची हौस बनली आहे. मात्र या हौसेचा फटका संपूर्ण शहराला बसत आहे.
आरोग्यावर होणारे गंभीर परिणाम
वैद्यकीय तज्ज्ञांच्या मते, अचानक होणारा मोठा आवाज हा केवळ त्रासदायक नसून आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकतो.

1) हृदयविकाराच्या रुग्णांवर परिणाम
अचानक होणाऱ्या कर्णकर्कश आवाजामुळे हृदयाचे ठोके झपाट्याने वाढू शकतात. हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांना छातीत धडधड, घाबरल्यासारखे वाटणे, श्वास घेण्यास त्रास अशी लक्षणे जाणवू शकतात. तीव्र भीतीमुळे हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढू शकतो.
2) उच्च रक्तदाब (ब्लड प्रेशर) असलेल्या रुग्णांवर परिणाम
मोठ्या आवाजामुळे शरीरात ताण निर्माण होतो व रक्तदाब अचानक वाढू शकतो. आधीच उच्च रक्तदाब असलेल्या व्यक्तींमध्ये डोकेदुखी, चक्कर येणे, अस्वस्थता वाढू शकते. वारंवार ताण आल्यास दीर्घकालीन आरोग्य बिघडण्याची शक्यता असते.
3) लहान मुले व जेष्ठ नागरिक
अचानक आवाजामुळे मुले दचकतात, रडू लागतात, मानसिक भीती निर्माण होते. जेष्ठ नागरिकांमध्ये तोल जाणे, हृदयाचे ठोके वाढणे, घाबरून पडण्याचे प्रकार घडू शकतात.
4) मानसिक आरोग्यावर परिणाम
वारंवार होणारा आवाज हा चिडचिड, झोप न लागणे, एकाग्रता कमी होणे यांस कारणीभूत ठरतो. व्यापारी व विद्यार्थ्यांच्या दैनंदिन कामावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे.
कायदेशीर तरतुदी काय सांगतात?
1) मोटार वाहन कायदा, १९८८ – कलम 52
वाहनाच्या मूळ रचनेत (Alteration) अनधिकृत बदल करणे दंडनीय आहे. कंपनीकडून बसवलेला सायलेन्सर काढून मॉडिफाईड, मोठा आवाज करणारा सायलेन्सर बसवणे या कलमान्वये गुन्हा ठरतो.
2) मोटार वाहन कायदा – कलम 199A
अल्पवयीन व्यक्ती वाहन चालवताना आढळल्यास वाहनमालक/पालक जबाबदार धरले जातात. ₹25,000 पर्यंत दंड, वाहन नोंदणी निलंबन आणि अल्पवयीनास परवाना नाकारण्याची तरतूद.
नागरिकांची ठाम मागणी
भिगवणमध्ये विशेष तपासणी मोहीम राबवून मॉडिफाईड सायलेन्सर जप्त करावेत, अल्पवयीन दुचाकीस्वारांवर कठोर कारवाई करावी आणि बाजारपेठ-शाळा परिसरात नियमित गस्त वाढवावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.
“एखादी मोठी दुर्घटना घडल्यावरच प्रशासन जागे होणार का?” असा संतप्त सवाल उपस्थित होत आहे. भिगवण पोलीस प्रशासनाने वेळीच लगाम न घातल्यास हा ‘फटाक्यांचा’ सुळसुळाट भविष्यात गंभीर परिणाम घडवू शकतो, अशी भीती व्यक्त केली जात आहे.




