अहिल्यानगर: जिल्हा परिषदेतील बदली (Ahilyanagar News) प्रक्रियेत खोट्या कागदपत्रांचा (Pune News) वापर करून सवलत मिळवणाऱ्या दोन प्राथमिक शिक्षिकांचा अखेर पर्दाफाश झाला आहे. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी त्यांचं तात्काळ निलंबन केलं आहे. सोहनी सुभाष पुरनाळे आणि जयश्री हरिश्चंद्र रहाटडे या दोन्ही शिक्षिकांनी स्वतःला घटस्फोटित असल्याचं दाखवत त्यांनी प्राधान्य श्रेणीचा लाभ घेतला होता. काही दिवसांपूर्वी चंद्रशेखर पंचमुख यांनी जिल्हा परिषदेत मोठ्या प्रमाणावर सुरू असलेल्या अशा फसवणुकीबाबत लेखी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर प्रशासनाने जिल्ह्यातील एकूण अठ्ठावन्न शिक्षिकांची समित्यांमार्फत तपासणी केली. अहिल्यानगर तालुक्यातील या दोन्ही शिक्षिका नवऱ्यापासून वेगळ्या राहत नसल्याचं समोर आल्यावर प्रशासनाने तातडीची कारवाई केली. (Latest Breaking News)

तपासादरम्यान आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. अनेक वेळा समित्या गठित करून अहवाल मागवले गेले तरी काही समित्यांनी जाणूनबुजून चुकीचे अहवाल दिले होते. या धक्कादायक गोष्टीमुळे आधीचे अहवाल दडपवणाऱ्या समित्यांवरही कारवाई करण्याची आणि संपूर्ण प्रक्रियेची अधिक काटेकोर पुनर्तपासणी करण्याची मागणी पंचमुख यांनी केली आहे. पारनेर, कर्जत, श्रीरामपूर आणि नेवासा येथील समित्यांनी दिलेले फेरअहवाल सर्व शिक्षिकांना निर्दोष ठरवत असले तरी या तपास प्रक्रियेची गुणवत्ता संशयास्पद असल्याचा आरोप होत आहे. त्यामुळे अजूनही अनेक जण शासनाकडून मिळणाऱ्या सवलतीसाठी खोट्या सहानुभूतीचे नाटक करत असल्याची शंका व्यक्त केली जात आहे.
बनावट कागदपत्रांच्या आधारे बदलीत सवलत मिळवणे ही सरळ सरळ प्रशासनाची फसवणूक असून असं करणं म्हणजे जनतेचा विश्वासघात करणं असं सांगत पंचमुख यांनी आरोपी शिक्षिकांवर फक्त निलंबनाची कारवाई न करता त्यांना बडतर्फ करावं आणि संबंधितांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी केली आहे. सद्य कारवाईनंतर जिल्हा परिषदेतील अशाच प्रकारे खोट्या दाव्यांवर सवलती मिळवणाऱ्या इतर अनेक कर्मचाऱ्यांवरही कारवाईची होण्याची शक्यता वाढली आहे आणि यामुळे संपूर्ण यंत्रणेत खळबळ उडाली आहे.






