PM Modi in Lok Sabha : पश्चिम आशियात अमेरिका-इस्रायल आणि इराण यांच्यात वाढलेल्या तणावामुळे जागतिक ऊर्जा पुरवठ्यावर मोठा परिणाम होत आहे. विशेषतः होर्मुझ सामुद्रधुनीतून होणारी तेल आणि वायू वाहतूक विस्कळीत झाल्याने भारतासह अनेक देशांवर इंधन संकटाचे सावट गडद झाले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 23 मार्च 2026 रोजी लोकसभेत महत्त्वपूर्ण निवेदन करत परिस्थितीची गंभीरता स्पष्ट केली. ते म्हणाले कि युद्धाचे परिणाम केवळ तात्पुरते न राहता दीर्घकालीन असतील, आणि या संकटाचा सामना करण्यासाठी देशाला कोरोनाकाळात ज्या धैर्याने आणि एकजुटीने लढा दिला, त्याच पद्धतीने सज्ज राहावे लागेल, असे पंतप्रधान मोदी यांनी स्पष्टपणे सांगितले.

गेल्या 3 आठवड्यांपासून सुरू असलेल्या या संघर्षामुळे कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात अडथळे निर्माण झाले आहेत. होर्मुझ सामुद्रधुनी ही जगातील सुमारे 20% तेल वाहतुकीसाठी महत्त्वाची मानली जाते. त्यामुळे या मार्गावर परिणाम झाला की त्याचा थेट फटका भारतासारख्या आयात-निर्भर देशांना बसतो. भारत आपल्या गरजेपैकी मोठा हिस्सा आयातीवर अवलंबून असल्याने इंधन दरवाढ, एलपीजी तुटवडा आणि वाहतूक खर्च वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने काही महत्त्वाची पावले उचलली आहेत. पंतप्रधानांनी सांगितले की, भारत आता 27 देशांऐवजी 41 देशांकडून ऊर्जा आयात करत आहे, म्हणजेच पुरवठ्याचे स्रोत विविध करण्यात आले आहेत. सध्या भारताकडे 5.3 दशलक्ष मेट्रिक टन कच्च्या तेलाचा साठा उपलब्ध असून तो 6.5 दशलक्ष मेट्रिक टनांपर्यंत वाढवण्याचे काम सुरू आहे. याशिवाय, देशांतर्गत एलपीजी उत्पादन वाढवण्यावरही भर दिला जात आहे.
या युद्धाचा आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे परदेशात राहणारे भारतीय. पश्चिम आशियात सुमारे 1 कोटी भारतीय वास्तव्यास असून त्यांच्या सुरक्षिततेसाठी 24×7 हेल्पलाइन आणि दूतावासांमार्फत मदत सुरू आहे.







