मुंबई: नोंदणी व मुद्रांक विभागाच्या सुधारित आकृतीबंधाला अखेर राज्य शासनाची मंजुरी मिळाली असून विभागाच्या रचनेत मोठा बदल करण्यात आला आहे. महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व वन विभागाने 4 डिसेंबर 2025 रोजी सुधारित आकृतीबंधास मान्यता देणारा शासन निर्णय जारी केला. या निर्णयानुसार विभागातील मंजूर पदांची संख्या आता 3,952 झाली आहे, अशी माहिती नोंदणी महानिरीक्षक रविंद्र बिनवडे यांनी दिली.

सध्याच्या मंजूर 3,094 पदांपैकी 107 पदे रद्द करण्यात आली असून 965 नवीन पदे निर्माण करण्यात आली आहेत. यामुळे विभाग अधिक सक्षम आणि मनुष्यबळसंपन्न होईल, असे बिनवडे यांनी सांगितले. विभागाच्या आकृतीबंधातील बदलाची मागणी 2016 पासून प्रलंबित होती. विभागातील कामकाज मोठ्या प्रमाणावर वाढले असल्याने या पुनर्रचनेची तातडीची गरज भासू लागली होती. नवीन दुय्यम निबंधक कार्यालयांची उभारणी, दस्तनोंदणीची संख्या वाढणे आणि विविध प्रक्रियांमध्ये वाढ झाल्याने मनुष्यबळाची आवश्यकता अधिक प्रकर्षाने जाणवत होती.
नोंदणी व मुद्रांक विभाग हा राज्यासाठी महसूल उत्पन्न करणारा दुसऱ्या क्रमांकाचा महत्त्वपूर्ण विभाग आहे. सुधारित आकृतीबंधामुळे विभागातील मनुष्यबळ वाढेल, कामकाजाचा वेग सुधरेल आणि शासनाला दरवर्षी ठरवलेल्या महसूल इष्टांकाची पूर्तता करण्यात मदत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
या बदलामुळे नागरिकांना अधिक जलद व सक्षम सेवा देण्याचा शासनाचा उद्देश साध्य होईल, असेही बिनवडे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे. विभाग सक्षम झाल्याने दस्त नोंदणी आणि अन्य सेवा अधिक सुरळीत चालतील, तसेच महसूल वाढीसही गती मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.







