Iran Israel Conflict: दिल्ली: आखाती भागात तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर चिंता वाढली आहे. शनिवारी इस्त्रायल आणि अमेरिकेने संयुक्त कारवाई करत इराणवर हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. या घटनेत इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू झाल्याचा दावा केला जात आहे. या पार्श्वभूमीवर संपूर्ण आखाती प्रदेशात अस्थिरता वाढली असून परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे.

इराणने प्रत्युत्तर म्हणून सौदी अरब, बहरीन आणि अबुधाबी येथील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य केल्याचे वृत्त आहे. त्यामुळे मध्य पूर्वेत तणाव अधिक वाढला आहे. या घडामोडींमध्ये पाकिस्ताननेही प्रतिक्रिया दिली आहे. पाकिस्तानचे राष्ट्रपती आसिफ अली जरदारी यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशनात भारतासोबतच्या संबंधांवर भाष्य केले.
जरदारी यांनी भारत मोठ्या युद्धाची तयारी करत असल्याचा आरोप केला. भारतीय नेते युद्धाची भाषा करत असल्याचे ते म्हणाले. मात्र, पाकिस्तान प्रादेशिक शांततेचा समर्थक असून युद्ध हा योग्य मार्ग नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. भारताने चर्चेच्या माध्यमातून प्रश्न सोडवावेत, असे आवाहन त्यांनी केले. दक्षिण आशियात वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचे हे वक्तव्य महत्त्वाचे मानले जात आहे.
अफगाणिस्तानबाबत बोलताना त्यांनी पाकिस्तानवर होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यांचा उल्लेख केला. दोहा कराराचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत त्यांनी कठोर भूमिका व्यक्त केली. तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान आणि बलोचिस्तान लिबरेशन आर्मी यांसारख्या संघटनांना आश्रय दिला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, गिलगिट-बाल्टिस्तानमधील स्कर्दू येथे निदर्शने झाल्याचे वृत्त आहे. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी लष्कर तैनात करण्यात आले असून 3 दिवसांची संचारबंदी लागू करण्यात आली आहे. एकीकडे भारतासोबत संवादाचे आवाहन आणि दुसरीकडे सीमावाद यामुळे पाकिस्तान सध्या कठीण परिस्थितीत असल्याचे दिसत आहे.





