मुंबई: मुंबईतील लोकसंख्येमध्ये होत (TISS Report) असलेल्या बदलांबाबत टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सने तयार केलेला एक जुना रिपोर्ट पुन्हा एकदा समोर आला असून त्यामुळे मोठी राजकीय खळबळ उडाली आहे. आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर या रिपोर्टमधील आकडेवारीने सर्वांचे लक्ष वेधले आहे. या अहवालानुसार, मुंबई शहराची सामाजिक आणि धार्मिक रचना वेगाने बदलत चालली आहे. भाजप नेते किरीट सोमय्या यांनी या मुद्द्यावर भाष्य करताना म्हटले आहे की, बांगलादेशी घुसखोरांच्या वाढत्या हस्तक्षेपामुळे शहराच्या मूळ ओळखीला धक्का लागत आहे.

पाहा पोस्ट:
#Bangladeshi Infiltrators in Mumbai
Tata Institute of Social Science TISS report says
Hindu Population was 88% in 1961 will be reduced to 54% in 2051
Significant rise in Muslim population from 8% in 1961 & will be 30% in 2051 pic.twitter.com/H2ScNby6sr
— Kirit Somaiya (@KiritSomaiya) December 23, 2025
लोकसंख्येचा आढावा घेतला असता असे दिसून येते की, 1961 मध्ये शहरात हिंदू समाजाचे प्रमाण 88 टक्के होते, जे 2011 च्या आकडेवारीनुसार 66 टक्क्यांपर्यंत खाली आले आहे. येणाऱ्या 2051 सालापर्यंत हे प्रमाण 54 टक्क्यांपर्यंत घसरण्याची भीती या अभ्यासात व्यक्त केली आहे. याउलट, 1961 साली 8 टक्के असलेली मुस्लिमांची संख्या 2011 मध्ये 21 टक्क्यांवर पोहोचली असून भविष्यात ती 30 टक्क्यांपर्यंत जाण्याचा अंदाज आहे. बांगलादेशी आणि रोहिंग्या नागरिकांच्या अनधिकृत प्रवेशामुळे ही परिस्थिती निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. काही राजकीय गट आपल्या फायद्यासाठी या लोकांची नावे मतदार यादीत समाविष्ट करत असल्याचा आरोपही केला जात आहे.
अनधिकृतपणे राहणाऱ्या या लोकांमुळे मुंबईच्या सोयीसुविधांवर प्रचंड ताण येत आहे. झोपडपट्टी भागातील वाढती गर्दी आणि पाणी, वीज, आरोग्य यांसारख्या सरकारी सेवांचा तुटवडा यामुळे स्थानिक मुंबईकर त्रस्त झाले आहेत. हे घुसखोर कमी पगारात काम करण्यास तयार होत असल्यामुळे मराठी आणि स्थानिक मजुरांच्या रोजगारावर गदा येत आहे. तसेच, मुंबईत कमावलेला पैसा मोठ्या प्रमाणात बाहेरच्या देशात पाठवला जात असून गुन्हेगारी आणि मानवी तस्करीच्या प्रमाणातही वाढ झाली आहे. वेळीच योग्य उपाययोजना केल्या नाहीत, तर मुंबईचा सामाजिक ढाचा पूर्णपणे बिघडू शकतो, असा इशारा या माध्यमातून देण्यात आला आहे.







