मुंबई: विकासकामांमध्ये गुणवत्ता आणि वेग या दोन्ही गोष्टींना राज्य शासनाचे प्राधान्य असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी स्पष्ट केले. मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकाजवळील 130 वर्षे जुन्या पुलाच्या पुनर्बांधणीचे काम नियोजित मुदतीपेक्षा चार महिने आधी, अवघ्या 15 महिन्यांत पूर्ण केल्याबद्दल त्यांनी बृहमुंबाई महानगर पालिकेचे अभिनंदन केले.

पुलाच्या लोकार्पण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दूरदृश्य प्रणालीद्वारे उपस्थित होते. तसेच विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, मंत्री मंगलप्रभात लोढा, दत्तात्रय भरणे, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार अमिन पटेल, महापौर रितू तावडे, उपमहापौर संजय घाडी, विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर आणि महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, वाहतुकीच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या या पुलाची मुदत संपली होती. त्यामुळे सुरक्षितता लक्षात घेऊन त्याची तातडीने पुनर्बांधणी करणे आवश्यक होते. महानगरपालिकेने काटेकोर नियोजन करून हे काम मुदतीआधी पूर्ण केले, ही प्रशंसनीय बाब असल्याचे त्यांनी नमूद केले. मुंबईत सध्या आणखी सहा पूल अंतिम टप्प्यात असून येत्या दोन-तीन महिन्यांत त्यांचेही लोकार्पण होणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
या पुलाचे नामकरण ‘पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर’ असे करण्यात येणार असल्याची घोषणाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. अहिल्याबाई होळकर यांनी आदर्श प्रशासन, प्रजाहितदक्ष राज्यकारभार, धर्मपरायणता आणि सामाजिक बांधिलकी यांचा उत्तम नमुना घालून दिला. त्यांनी उभारलेली मंदिरे, घाट, उद्योग आणि महिलांसाठी घेतलेले उपक्रम आजही प्रेरणादायी असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले.
राजमाता अहिल्यादेवींच्या कार्यातून प्रेरणा घेऊन राज्य शासन आणि महानगरपालिका विकासकामांना गती देत राहतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.







