मुंबई: कल्याण डोंबिवली महापालिकेच्या निवडणुकीत (Devendra Fadanavis) पहिल्याच टप्प्यात महायुतीचे 21 उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने राज्याच्या राजकारणात (Maharashtra Politics) चर्चा सुरू झाली आहे. या मुद्द्यावरून विरोधकांकडून जोरदार टीका होत असताना, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यावर स्पष्ट आणि आक्रमक प्रतिक्रिया दिली आहे. काहींना पोटदुखी झाली आहे, तुमको मिरची लगी तो मैं क्या करु, अशा शब्दांत मुख्यमंत्री फडणवीस यांनी विरोधकांना टोला लगावला. (Latest Marathi News)

कल्याण पूर्व येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. त्यांनी सांगितले की, विरोधकांकडे निवडणुकीसाठी उमेदवारच नव्हते. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. यामध्ये चुकीचे काय आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महायुतीचे उमेदवार निवडून आले की विरोधकांकडून लगेच नवा नरेटिव्ह तयार केला जातो. आधी ईव्हीएमवर आरोप झाले, आता बिनविरोध निवडींवर टीका सुरू आहे. यापूर्वी संसदेत 35 खासदार बिनविरोध निवडून आले होते, त्यापैकी 33 खासदार काँग्रेसचे होते. तेव्हा लोकशाही धोक्यात आली नव्हती, पण आता महायुतीचे उमेदवार निवडून आले की लोकशाहीची हत्या झाली असे म्हणणाऱ्यांनी आरशात पाहावे, असा सल्लाही त्यांनी दिला.
पुढे बोलताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी विकासकामांचा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात महाराष्ट्राला 50 हजार कोटी रुपयांचा विकास निधी मिळाला असल्याचे त्यांनी सांगितले. 2014 पूर्वी मुंबई महानगर प्रदेशातील शहरांना पुरेसा निधी मिळत नव्हता. मात्र महायुती सरकारच्या काळात एमएमआर रिजनसाठी 4 लाख कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
15 जानेवारी रोजी कमळ आणि धनुष्यबाणाच्या चिन्हावर मतदान करण्याचे आवाहन करत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, पुढील 5 वर्षे तुमची चिंता आम्ही करू. कल्याण डोंबिवली ही एमएमआर रिजनमधील सर्वोत्तम महापालिका बनवण्याची हमीही त्यांनी यावेळी दिली.







