मुंबई: मराठी सिनेसृष्टीतील आपल्या बेधडक स्वभावासाठी ओळखली जाणारी अभिनेत्री तेजस्विनी पंडित सोशल मीडियावरील एका पोस्टमुळे वादाच्या आणि चर्चेच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलेल्या “चला पुढच्या 5 वर्षात सगळे मरुया!” या एका वाक्याने महाराष्ट्रभरात खळबळ उडवून दिली आहे. तिच्या या विधानाची चर्चा सर्वत्र सुरू असून, नेटकरी यावर विविध प्रतिक्रिया देत आहेत.

खरे तर, हे विधान कोणत्या चित्रपटाच्या प्रसिद्धीसाठी नसून, ते देशावर ओढवलेल्या पाणीटंचाईच्या गंभीर संकटाकडे लक्ष वेधण्यासाठी आहे. पाण्यावाचून मानवी जीवन आणि निसर्गाची होणारी हानी यावर तेजस्विनीने भाष्य केले आहे. पाणीटंचाई म्हणजे केवळ पिण्याचा प्रश्न नाही, तर ती आपली अन्न सुरक्षा, आर्थिक स्थिती आणि आरोग्यावर येणारे मोठे संकट आहे, याची जाणीव तिने करून दिली आहे. “जेव्हा एखादा समाज विनाशाच्या उंबरठ्यावर असतो, तेव्हा त्याला धोक्याचा अंदाज येत नाही,” अशा आशयाचे तिचे मत समाजमन ढवळून काढणारे आहे.

शहरांमधील पाण्याचा अतिवापर, नद्यांचे प्रदूषण आणि शेतीची झालेली नासाडी या सर्वांकडे तेजस्विनीने एका मोठ्या पर्यावरणीय संकटाची सुरुवात म्हणून पाहिले आहे. पर्यावरणाचा दिवसेंदिवस होणारा हा ऱ्हास पाहून ती प्रचंड अस्वस्थ झाली आहे. त्यामुळेच प्रशासनाला आणि झोपलेल्या समाजाला खडबडून जागे करण्यासाठी तिने हे टोकदार आणि उपरोधिक विधान केले आहे. तिची ही पोस्ट सोशल मीडियावर वेगाने पसरत असून, पर्यावरणाबद्दल जागरूक असलेल्या नेटिझन्सनी तिच्या या धाडसी पाऊलाचे स्वागत केले आहे.






