Urali Kanchan : पुणे-सोलापूर महामार्गावरील सर्वात मोठी बाजारपेठ म्हणून ओळख असलेल्या उरुळी कांचन (ता. हवेली) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाची निवडणूक शुक्रवारी (ता. 19) होणार आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सदस्यांमधून हि निवड होणार आहे. ग्रामपंचायतीसाठी या पंचवार्षिकमधील शेवटचे सरपंचपद असल्याने या निवडणुकीत सरपंच बिनविरोध होणार की घोडेबाजार होऊन निवडणूक होणार याकडे परिसरातील नागरिकांचे लक्ष लागले आहे. (Urali Kanchan)

यापूर्वीच्या सरपंच ऋतुजा अजिंक्य कांचन यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने शुक्रवारी सरपंच पदाची निवडणूक होत आहे. गावातील प्रतिष्ठेचे हे पद असल्याने अनेक इच्छुकांनी कोणत्याही परिस्थितीत पद मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. त्यातूनच मोठ्या प्रमाणात घोडेबाजार सुरू झाले असल्याची चर्चा आहे. उरुळी कांचन ग्रामपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक पक्षनिहाय अथवा पॅनेलनिहाय लढली गेली नव्हती. त्यामुळे सरपंचपदासाठी ग्रामपंचायत स्तरावरील विविध गट एकत्र आले होते. यातूनच प्रथम सरपंचपदी संतोष हरिभाऊ कांचन व उपसरपंचपदी संचिता संतोष कांचन यांची निवड झाली होती.
शुक्रवारी होणाऱ्या सरपंचाची निवड ही सदस्यांमधून होणार असल्याने अनेक सदस्य हे सरपंच पदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून आहेत. परिसरात औद्योगिकीकरण वाढले आहे. त्यामुळे अशा ठिकाणी सरपंचपद हे प्रतिष्ठा आणि पैसा मिळवून देणारे असते. त्यामुळे या ठिकाणी इच्छुकांची संख्या अधिक आहे. गावाच्या सरपंच पदासाठीही रस्सीखेच आहे. त्यामुळे या पदाच्या निवडीच्या आधी घोडेबाजार सुरू झाला आहे. तसेच आगामी निवडणूकीत उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे सरपंच पद हे खुल्या वर्गातील महिलेसाठी राखीव असल्याने प्रत्येकाचा कस या निवडणुकीत लागणार आहे.
दरम्यान, उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सतराही जागा, विविध गटांनी आपापल्या पद्धतीने एकत्र येत सोयीनुसार आघाड्या करुन लढविल्या होत्या. हा प्रयोग उरुळी कांचनच्या राजकारणात रंगला होता. उरुळी कांचनचे यापूर्वीचे राजकारण लक्षात घेता, सरपंचपदासाठी घोडेबाजार रंगणार याबाबत उरुळी कांचन व परीसरात चर्चा रंगू लागली आहे.
दरम्यान, नाव न छापण्याच्या अटीवर ज्येष्ठ राजकीय मातब्बर म्हणाले, “उरुळी कांचन येथील ग्रामपंचायतीची सरपंच पदाची निवडणूक ही होणारअसली तरी शेवटच्या 5 ते 10 मिनिटात कोण कोण अर्ज दाखल करतो यावर उरुळी कांचनचा सरपंच अवलंबून आहे. त्यामुळे दुसरा फॉर्म आला तर नक्कीच यावेळीही वेगळाच सरपंच दिसण्याची शक्यता आहे.”
शेवटच्या पाच मिनिटात धक्कातंत्र
मागील सरपंच पदाच्या निवडणुकीत मिलींद जगताप व अमित उर्फ बाबा भाऊसाहेब कांचन यांच्यात निवडणूक झाली होती. अमित कांचन यांनी शेवटच्या पाच मिनिटात अर्ज दाखल करून धक्कातंत्र अवलंबले होते. या डावपेचातून झालेल्या निवडणूकीत अमित कांचन यांनी 17 पैकी 9 मते मिळवून सरपंचपद खेचले होते. त्यामुळे उरुळी कांचन ग्रामपंचायतीचे राजकारण अनेक धक्कातंत्र डावपेचावर अवलंबून असल्याने तालुक्यातील राजकीय मातबरांसह नागरिकांचे या निवडणुकीकडे लक्ष लागले आहे.






