नवी दिल्ली: संसदेच्या हिवाळी अधिवेशनात आज लोकसभेत निवडणूक प्रक्रियेतील सुधारणा, गैरप्रकार आणि निवडणुकांची पारदर्शकता या मुद्द्यांवर सविस्तर चर्चा झाली. गेल्या काही महिन्यांपासून विविध राज्यांतील निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप विरोधकांकडून होत असून, स्वतः विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी दुहेरी मतदार, चुकीचे तपशील आणि मतदार याद्यांतील विसंगतींचे पुरावे पत्रकार परिषदेत सादर केले होते. राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी या चर्चेत जोरदार भाषण करत केंद्र सरकार आणि निवडणूक आयोगावर कडाडून टीका केली.

ज्या मशीनवरून निवडून आले, त्यावर प्रश्नचिन्ह
खासदार सुप्रिया सुळे यांनी भाषणाच्या सुरुवातीला स्पष्ट केले की, त्या ईव्हीएम किंवा व्हीव्हीपॅटवर आक्षेप घेणार नाहीत. “मी ज्या मशीनवरून निवडून आले, त्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही. काही दोष असेल, तर त्याचा फटका मलाही बसायला हवा,” असे सांगून त्यांनी थेट भाजपावर निशाणा साधला.
महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील गैरप्रकारांचा उल्लेख
सुळे यांनी महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील गैरप्रकारांचा उल्लेख करत सांगितले की, “अर्ज प्रक्रिया, माघारी, आरक्षण सगळ्याच ठिकाणी गडबड दिसून आली. भाजपाच्या एका मित्रपक्षाच्या आमदाराने त्यांच्या आमदारावरच पैसे वाटल्याचा आरोप केला आहे. शिवसेनेच्या आमदारानेही एका भाजप नेत्याच्या घरी छाप्यात रोख रक्कम जप्त केल्याचा दावा केला. माझ्याकडे अनेक पुरावे आहेत.” अशा किमान दहा उदाहरणांचा त्यांनी उल्लेख केला.
निवडणूक आयोगावर टीका
निवडणूक आयोगावर टीका करताना सुळे म्हणाल्या, “महाराष्ट्रात निवडणूक आयोग आहे की नाही, हेच कळत नाही. आम्ही भेटायला गेलो तर मौन पाळल्यागत काहीच माहिती दिली जात नाही. महाराष्ट्राच्या इतिहासात कधी हिंसा झाली नाही, पण यावेळी बंदुका दाखवल्या गेल्या, गाड्या फोडल्या गेल्या, ईव्हीएमची कुलुपं तोडली गेली. हे कोण करतंय, हे राज्याचे गृह खाते किंवा मुख्यमंत्रीच सांगू शकतील.”
मला माझ्या घराणेशाहीचा आभिमान; सुळे
यावेळी घराणेशाहीच्या आरोपांवरही त्यांनी स्पष्ट भूमिका मांडली. “मी घराणेशाहीचीच आहे आणि मला त्याचा अभिमान आहे. माझ्या आई-वडिलांच्या परंपरेतून येणं माझ्यासाठी गौरवाची गोष्ट आहे. विरोधकांकडेच नव्हे तर सत्ताधाऱ्यांकडेही अधिक घराणी आहेत,” अशी त्यांनी खोचक टिप्पणीही केली.
महाराष्ट्रातील बिनविरोध निवडणुकांचा मुद्दा मांडत सुळे म्हणाल्या की, “25 ठिकाणी निवडणूकच झाली नाही. अनेक उमेदवारांना अर्ज भरू दिले गेले नाहीत. शिरूरमध्ये तर हजार मतं अशी आली ज्यांचे पत्ते, ओळख काहीच उपलब्ध नाही.”
त्यांनी यावेळी घराणेशाहीची यादीचं वाचून दाखवली. यात
- भुसावळ: रजनी सावकारे (मंत्री संजय सावकारे यांच्या पत्नी)
- जामनेर: साधना महाजन (मंत्री गिरीश महाजन यांच्या पत्नी)
- खामगाव: अपर्णा फुंडकर (मंत्री आकाश फुंडकर यांच्या वहिनी)
- दोंडाईचा: मंत्री जयकुमार रावळ यांच्या मातोश्री
- चाळीसगाव: प्रतिभा चव्हाण (मंगेश चव्हाण यांच्या पत्नी)
- यवतमाळ: प्रियदर्शनी उके (मंत्री अशोक उकेंची कन्या)
या सर्व ठिकाणी प्रतिस्पर्धी उमेदवार उभेच राहू शकले नाहीत, असा आरोप सुळे यांनी केला आहे.






