Pune News: पुणे : पुण्यात एका जोडप्याने अगदी तीन महिन्यातच घटस्फोट घेतल्याची माहिती समोर येत आहे. थाटामाटात विवाहबंधनात अडकलेल्या या जोडप्याने तीन महिनेच संसार केला अन् नंतर विभक्त राहण्याचा निर्णय घेतला. लग्नानंतर पत्नी माहेरी गेल्यानंतर तिला परत नांदायला यावे, यासाठी पतीने केलेला अर्ज काही दिवसांतच परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या (Divorce)अर्जात बदलला. न्यायालयीन समुपदेशनात एकत्र राहणे शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर दोघांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. (Pune News)

हेही वाचा- सोन्याचा मोह पडला महागात! ’25 लाखांत अर्धा तोळे सोनं देतो’ म्हणाला अन् महिलेने पैसे दिल्यावर लगेचच…
निखिल आणि साक्षी या दोघांचे ( नावे असून गोपनीयतेसाठी ती बदलण्यात आली आहेत) लग्न 10 सप्टेंबर 2024 रोजी मोठ्या उत्साहात पार पडले होते. निखिल हा डॉक्टर असून साक्षी एका आयटी कंपनीत कामाला आहे. कुटुंबियाच्या साक्षीने दोघांनीही आयुष्यभराची साथ देण्याची शपथ घेतली होती. मात्र, लग्नानंतर काही दिवसांतच त्यांच्यात दोघांमध्ये भांडण सुरु झाले आणि अवघ्या तीन महिन्यांतच परिस्थिती गंभीर झाली. सततच्या भांडणांमुळे साक्षी माहेरी निघून गेली.
संसार टिकवण्यासाठी निखिलने कौटुंबिक न्यायालयात पत्नीने परत नांदायला यावे, असा अर्ज दाखल केला. या अर्जाची नोटीस मिळाल्यानंतर साक्षी न्यायालयात हजर झाली. त्यानंतर न्यायालयाने दोघांनाही समुपदेशनासाठी पाठवले. समुपदेशकासमोर चर्चा झाल्यानंतर पुन्हा एकत्र राहण्याऐवजी वेगळे होणेच योग्य असल्याचा निर्णय दोघांनी घेतला.
यानंतर पतीने दाखल केलेला अर्ज परस्पर संमतीच्या घटस्फोटाच्या अर्जात रूपांतरित करण्यात आला. दोघांच्या वकिलांनी कायद्यानुसार आवश्यक असलेला 6 महिन्यांचा प्रतीक्षा कालावधी माफ करण्याची मागणी केली. दोघांमधील वाढलेली कटुता आणि परस्पर संमती लक्षात घेऊन न्यायालयाने ही मागणी मान्य केली आणि घटस्फोटाला मंजुरी दिली.
या प्रकरणात कोणताही वाद न वाढवता शांतपणे आणि सन्मानाने नात्याला थांबवण्यात आले. मतभेद टोकाला गेल्यास नाते जबरदस्तीने टिकवणे मानसिक आरोग्यासाठी घातक ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.






