पुणे: परभणी जिल्ह्यात लग्नाचे आमिष (Pune Crime) दाखवून तरुणांची फसवणूक करणारी (Pune News) एक टोळी सक्रिय असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. पुण्यातील एका तरुणाची अशीच फसवणूक झाली असून, लग्नानंतर नवरी दागिन्यांसह पसार झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणात पालम पोलिसांनी गुन्हा नोंदवून दोन महिलांना अटक केली आहे. इतर आरोपींचा शोध सुरू आहे.

पुणे येथील किरण रोहिदास मोरे यांचे लग्न जुळवण्यासाठी त्यांचे कुटुंब परभणीच्या पालम येथील काही मध्यस्थांच्या संपर्कात आले होते. विनायक जाधव, रेखा सूर्यवंशी, रंजना मोरे, नवनाथ बंडगिरे आणि प्रवीण कानेगावकर यांनी मुलगी दाखवण्याची जबाबदारी घेतली. या टोळीने मुलीचे बनावट आधार कार्ड तयार केले आणि ती पालमचीच आहे असा विश्वास मोरे कुटुंबाला बसवला. मुलगी पसंत झाल्यानंतर 90 हजार रुपये रोख, 35 हजारांचे मंगळसूत्र आणि इतर दागिन्यांसह एकूण 3 लाख 25 हजार रुपये देऊन लग्न करण्याचे ठरले.
3 डिसेंबर रोजी दुपारी दीड वाजता केरवाडी शिवारातील हनुमान मंदिरासमोर पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा पार पडला. त्यानंतर नवदाम्पत्य पुण्याकडे निघाले. मात्र, अंबाजोगाई येथे चहा पिण्यासाठी थांबलेल्या नवरीने अचानक मागून आलेल्या वाहनात बसून पळ काढला. तिच्याकडे लग्नात मिळालेले दागिने आणि रोकड असल्याने नवरदेवाला आपली फसवणूक झाल्याचे उमगले.
त्यानंतर किरण मोरे आणि त्यांचे कुटुंब पालम पोलीस ठाण्यात गेले आणि तक्रार दाखल केली. या प्रकरणात एकूण 11 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. विवाह सोहळ्यात सहभागी असलेल्या दोन महिलांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. गावात आणि परिसरात या घटनेची मोठी चर्चा असून अशा फसवणूक टोळ्यांपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात येत आहे.







