पुणे: खाद्यतेलासाठी (Oilseeds) भारताचे विदेशी आयातीवरील अवलंबित्व कमी करणे आणि देशांतर्गत तेलबियांचे उत्पादन वाढवून शेतकऱ्यांचे उत्पन्न सुधारणे, या दोन मुख्य उद्देशांसाठी कृषी विभागाने मोठा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय खाद्यतेल अभियान अंतर्गत उन्हाळी हंगामातील भुईमूग आणि तीळ पिकांसाठी प्रमाणित बियाणे संपूर्ण अनुदानावर (100%) वितरीत करण्यात येणार आहे.

‘या’ 13 जिल्ह्यांना प्राधान्य
राज्यातील एकूण 13 जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना या योजनेचा थेट लाभ मिळेल. प्रथम अर्ज करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रथम प्राधान्य या तत्त्वावर बियाणे दिले जाईल.
-
भुईमूग: नाशिक, धुळे, अहिल्यानगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, संभाजीनगर आणि अकोला.
-
तीळ: जळगाव, बीड, लातूर आणि बुलढाणा.
अनुदानाचा तपशील
पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी आणि सुधारित वाण वापरण्यासाठी हे अनुदान दिले जाईल.
-
भुईमूग: प्रति हेक्टर 150 किलो शेंगा (किंमत 114 प्रति किलो दराने).
-
तीळ: प्रति हेक्टर 2.5 किलो बियाणे (किंमत 197 प्रति किलो दराने).
या अनुदानाचा लाभ घेण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याला किमान 0.20 हेक्टर ते कमाल 1 हेक्टर एवढ्या मर्यादेत क्षेत्रासाठीच अर्ज करता येईल. या योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे बंधनकारक आहे. शिवाय, अर्ज सादर करण्यापूर्वी शेतकऱ्यांची ‘ॲग्रीस्टॅक’वर नोंदणी झालेली असणे अत्यावश्यक आहे. नोंदणीशिवाय अर्ज स्वीकारला जाणार नाही. कृषी विभागाने इच्छुक शेतकरी बांधवांना त्वरीत ऑनलाईन अर्ज करून या संधीचा फायदा घेण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती आणि मदतीसाठी नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा.







