पुणे : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मीक कराड याला सर्वोच्च न्यायालयाने पुन्हा एकदा मोठा धक्का दिला आहे. कराड याने जामिनासाठी दाखल केलेली पुनर्विलोकन याचिका सर्वोच्च न्यायालयाने पूर्णपणे फेटाळून लावली आहे.

न्यायमूर्ती एम. एम. सुंदरेश आणि न्यायमूर्ती एन. कोटेश्वर सिंग यांच्या खंडपीठाने 14 जुलै 2026 रोजी या प्रकरणावर सुनावणी घेतली. ‘मागील आदेशात अशी कोणतीही चूक किंवा त्रुटी नाही, ज्यावर पुन्हा विचार करण्याची गरज भासेल,’ असे स्पष्ट निरीक्षण नोंदवत न्यायालयाने हा निर्णय दिला. यापूर्वी सत्र आणि उच्च न्यायालयानेही त्याचा जामीन नाकारला होता, तर सर्वोच्च न्यायालयाने 26 फेब्रुवारी 2026 रोजी त्याला दिलासा देण्यास नकार दिला होता.

हे अत्यंत थरारक आणि अमानुष हत्याकांड 9 डिसेंबर 2024 रोजी बीडच्या केज तालुक्यातील टाकळी शिवार भागात घडले होते. आरोपी विष्णू चाटे, जयराम चाटे, सुदर्शन घुले, कृष्णा आंधळे, सुधीर सांगळे, महेश केदार आणि प्रतीक घुले यांनी सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण केले. त्यानंतर त्यांना सुदर्शन घुले याच्या शेतात नेऊन विवस्त्र केले आणि लोखंडी रॉड तसेच गॅस पाईपने बेदम मारहाण करून त्यांचे हात-पाय तोडले. या अंगावर काटा आणणाऱ्या कृत्यादरम्यान, परळीतील गुंड आणि माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा निकटवर्तीय असलेला वाल्मीक कराड याला आरोपींनी थेट ‘व्हिडिओ कॉल’ करून हा सर्व प्रकार लाईव्ह दाखवला होता.
या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण महाराष्ट्रात तीव्र संतापाची लाट उसळली होती. पोलिसांनी प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सर्व आरोपींवर तातडीने ‘मकोका’ अंतर्गत कडक कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी न्यायालयात तब्बल 1800 पानांचे दोषारोपपत्र दाखल केले आहे. पोलिसांना आरोपींच्या मोबाईलमधून हत्येचे थेट 15 व्हिडिओ आणि 8 फोटो मिळाले आहेत, ज्यामध्ये आरोपी मारहाण करताना आनंद साजरा करताना दिसत आहेत.
दरम्यान या भक्कम पुराव्यांमुळे न्यायालयाने 12 मार्च 2025 रोजी झालेल्या पहिल्या सुनावणीतच आरोपी जयराम चाटेला तुरुंगातच ठेवण्याचे आदेश दिले होते. आता सर्वोच्च न्यायालयाच्या दिलेल्या या निर्णयामुळे आरोपींच्या अडचणी अधिकच वाढल्या आहेत.







