मुंबई: महानगरपालिका निवडणुकांच्या (Maharashtra Mahapalika Election) तयारीला आता वेग येत असून निवडणूक आयोगाने आज झालेल्या (Election Comission) बैठकीत महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. राज्यातील सर्व महानगरपालिकांमध्ये मतदार याद्यांतील संभाव्य दुबार मतदारांची सखोल तपासणी करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. आयोगाने स्पष्ट केले आहे की दुबार नावांची यादी संबंधित महानगरपालिकांनी आपल्या संकेतस्थळावर आणि सूचना फलकावर तातडीने प्रकाशित करावी. कोणत्याही प्रकारे मुदतवाढ दिली जाणार नाही, असा स्पष्ट संदेश आयोगाने दिला आहे. त्यामुळे निवडणुकीची घोषणा लवकरच होण्याची शक्यता असून 15 डिसेंबरच्या आसपास निवडणूक कार्यक्रम जाहीर होऊ शकतो. (Breaking News)

राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व महानगरपालिका आयुक्तांशी चर्चा केली. प्रारूप मतदार याद्यांवर हरकती आणि सूचना दाखल करण्याची अंतिम 3 डिसेंबर 2025 ही मुदत संपली असून 10 डिसेंबर 2025 रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करायच्या आहेत. त्याआधी दाखल सर्व हरकती आणि सूचनांवर योग्यती कार्यवाही करून वेळेत निपटारा करण्याचे निर्देश देण्यात आले.
आयुक्त वाघमारे यांनी सांगितले की संभाव्य दुबार मतदारांच्या नावासमोर मतदार याद्यांमध्ये दोन स्टार (**) दर्शवले आहेत. असे मतदार कोणत्या मतदान केंद्रावर मतदान करणार आहेत, त्याबाबत त्यांना आवाहन करण्यात यावे. मतदारांनी प्रतिसाद दिल्यास त्यांच्याकडून विहित नमुन्यात अर्ज भरून घ्यावा, आणि त्यांनी एकदा निवडलेले मतदान केंद्र वगळता इतर कोणत्याही केंद्रावर मतदान करता येणार नाही. प्रतिसाद न दिल्यास, अशा मतदाराने मतदान केंद्रावर आल्यावर त्याच्याकडून हमीपत्र घेऊन ओळख पटवल्यानंतरच मतदानाची मुभा देण्यात येईल.
राज्य निवडणूक आयोगाचे सचिव सुरेश काकाणी यांनी सांगितले की विधानसभा मतदारसंघांसाठी भारत निवडणूक आयोगाने तयार केलेल्या मतदार याद्या जशाच्या तशा महानगरपालिका निवडणुकांसाठी वापरल्या जातात. त्यांचे केवळ प्रभागनिहाय विभाजन केले जाते आणि मूळ यादीतील मतदारांचे नाव व पत्ता जसाच्या तसा ठेवला जातो. या निवडणुकांसाठी 1 जुलै 2025 हा अधिसूचित दिनांक निश्चित करण्यात आला असून त्या दिवशी अस्तित्वात असलेल्या विधानसभा मतदार याद्याच महानगरपालिका निवडणुकांसाठी लागू असतील. या निर्देशांमुळे महानगरपालिका निवडणुकांची प्रक्रिया अधिक काटेकोर आणि वेळबद्ध पद्धतीने पुढे जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.







