Maharashtra Local Body Election: महाराष्ट्र: महापालिका निवडणुकांची घोषणा झाल्यानंतर आता राज्यात जिल्हा परिषद निवडणुकांचीही हालचाल वेग घेण्याची शक्यता आहे. नगरपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांचा निकाल 21 डिसेंबर रोजी जाहीर झाल्यानंतर 2 ते 3 दिवसांत जिल्हा परिषद निवडणुकांची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून होऊ शकते. पहिल्या टप्प्यात कोल्हापूरसह एकूण 14 जिल्हा परिषदांच्या निवडणुका 23 ते 30 डिसेंबरदरम्यान जाहीर होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पुढील जिल्ह्यांचा समावेश
पहिल्या टप्प्यात कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, छत्रपती संभाजीनगर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, जालना, बीड, परभणी, धाराशिव आणि अहिल्यानगर या जिल्हा परिषदांचा समावेश असू शकतो. या जिल्ह्यांमध्ये प्रभाग आरक्षणाची स्थिती कायदेशीर असल्याने निवडणूक घेण्यास अडथळा नाही. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये निवडणूक होण्याची शक्यता अधिक आहे.
दुसरीकडे, प्रभाग आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या 18 जिल्हा परिषदांबाबत अजूनही संभ्रम कायम आहे. या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात 18 डिसेंबर रोजी सुनावणी होणार असून त्या निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. वर्धा जिल्ह्यात दाखल याचिकेवरील अंतिम निर्णयानंतर जिल्हा परिषद निवडणुकांचे चित्र स्पष्ट होणार आहे.
सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांच्या निवडणुका पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. त्यामुळे राज्य निवडणूक आयोगासमोर वेळेत निवडणुका घेण्याचे मोठे आव्हान आहे. सर्व निवडणुका एकाच वेळी घेतल्यास मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळ लागणार असल्याने जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन टप्पे ठेवले जातील की मुदतवाढ घेऊन एकाच टप्प्यात निवडणुका घेतल्या जातील, याबाबत चर्चा सुरू आहे.
दरम्यान, बृहन्मुंबईसह राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार असून 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होईल. एकूण 2869 जागांसाठी ही निवडणूक होणार आहे. या सर्व महानगरपालिका क्षेत्रांत आचारसंहिता लागू झाली असून, निवडणूक प्रक्रिया सर्वोच्च न्यायालयाच्या अंतिम निकालाच्या अधीन राहणार आहे.






