Ladki Bahin : कमी उत्पन्न असलेल्या कुटुंबांतील महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी राज्य सरकारने सुरू केलेली लाडकी बहीण योजना राज्यात मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय झाली आहे. ज्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी आहे, अशा कुटुंबांतील पात्र महिलांच्या बँक खात्यात या योजनेअंतर्गत दर महिन्याला 1500 रुपये जमा केले जातात. घरखर्च, औषधोपचार आणि दैनंदिन गरजांसाठी ही मदत अनेक महिलांसाठी महत्त्वाचा आधार ठरत आहे.

मात्र गेल्या काही महिन्यांपासून या योजनेतील लाभ वितरणात अनियमितता दिसून येत होती. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका सुरू असल्यामुळे लागू झालेल्या आचारसंहितेमुळे अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास विलंब झाला. विशेषतः जानेवारीनंतर अनेक लाभार्थींना पुढील हप्ते मिळाले नव्हते.
दरम्यान, आता या संदर्भात महत्त्वाची माहिती समोर आली आहे. सरकारने फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांचे हप्ते एकत्र देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नव्या आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात लाभार्थी महिलांच्या खात्यात एकाच वेळी 3000 रुपये जमा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे थांबलेले पैसे एकत्र मिळाल्याने अनेक महिलांना दिलासा मिळणार आहे.
याचबरोबर या योजनेत गैरव्यवहार टाळण्यासाठी सरकारने केवायसी प्रक्रिया सक्तीची केली आहे. काही महिलांनी पात्रता नसतानाही या योजनेचा लाभ घेतल्याचे समोर आल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. लाभार्थींना केवायसी पूर्ण करण्यासाठी सुरुवातीला 31 डिसेंबर 2025 पर्यंत मुदत देण्यात आली होती. मात्र अनेक ठिकाणी तांत्रिक त्रुटी आढळल्याने त्या दुरुस्त करण्यासाठी आता 31 मार्च पर्यंतची अंतिम मुदत देण्यात आली आहे.
या मुदतीनंतर ज्यांची केवायसी पूर्ण होणार नाही किंवा जे लाभार्थी पात्र ठरणार नाहीत, त्यांच्या खात्यातील हप्ते थांबवले जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्याच्या अर्थसंकल्पात या योजनेसाठी मोठी तरतूद करण्यात आली असून योजना बंद होणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे पात्र महिलांना पुढेही नियमित आर्थिक मदत मिळत राहणार असल्याचे सरकारने स्पष्ट केले आहे.







