मुंबई: राज्यभरात मुसळधार पावसामुळे निर्माण झालेल्या पूरस्थितीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज मंत्रालयातील राज्य आपत्ती व्यवस्थापन कक्ष येथे परिस्थितीचा आढावा घेतला.

नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता, घाबरून न जाता खबरदारी घ्यावी, असे आवाहन यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी केले. “राज्य सरकार आणि यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, आवश्यक ती सर्व मदत करण्यात येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुंबईसह पाच जिल्ह्यांना ‘रेड अलर्ट’
राज्यात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी आणि पालघर जिल्ह्यांसह घाटमाथ्यावरील भागांमध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाच्या सूचना लक्षात घेऊन आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दर तीन तासांनी अहवाल सादर केला जात आहे.
शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन
राज्यातील 10 लाख एकर शेती पूराच्या पाण्याखाली गेली असून, यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. धरणांवरील जलसाठ्यावर सतत लक्ष ठेवण्यात येत असून, धोका असलेल्या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचे संदेश पाठवले जात आहेत. नागरिकांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू आहे.
नांदेडसह पूरग्रस्त भागांमध्ये एनडीआरएफ आणि एसडीआरएफ तैनात
नांदेड जिल्ह्यातील पाण्याची पातळी वाढल्याने एनडीआरएफ आणि एसडीआरएफ पथकांना तैनात करण्यात आले आहे. अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असून, वैद्यकीय मदत आणि अन्नपुरवठ्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ सतत संपर्कात
मुख्यमंत्री, कृषिमंत्री, सर्व पालकमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांशी सतत संपर्क साधून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे. शेतकऱ्यांच्या नुकसानीसंदर्भात पाऊस ओसरल्यानंतर तातडीने पंचनामे करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
अत्याधुनिक यंत्रणेचा उपयोग
आपत्ती व्यवस्थापन कक्षामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाच्या साहाय्याने हवामान, वाऱ्याची दिशा, पावसाचे प्रमाण आदींचा मागोवा घेतला जात आहे. दर तीन तासांनी नकाशा व माहिती अद्ययावत करून निर्णय प्रक्रियेस गती दिली जात आहे.
या आढावा बैठकीस मुख्य सचिव राजेश कुमार, आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अपर मुख्य सचिव सोनिया सेठी, तसेच इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
नागरिकांनी अफवांपासून दूर राहून, अधिकृत माहितीवर विश्वास ठेवावा, असा पुनरुच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी केला.







