BREAKING NEWS : मुंबई, ठाण्यासह राज्यातील अनेक महापालिकांच्या प्रलंबित निवडणुकांचा अखेर कार्यक्रम जाहीर झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेऊन ही घोषणा केली. या सर्व 29 महापालिकांसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार असून 16 जानेवारीला निकाल लागणार आहे. आजपासून या निवडणुकांसाठी आचारसंहिता लागू करण्यात आली आहे.

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यामुळे या महापालिकांच्या निवडणुका गेल्या पाच ते सात वर्षांपासून रखडल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर आधी नगरपालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुका झाल्या, आणि आता उरलेल्या 29 महापालिकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे.
या निवडणुकांमध्ये राज्यभरातून सुमारे 3 कोटी 48 लाख मतदार मतदान करणार आहेत. यासाठी एकूण 39 हजारांहून अधिक मतदान केंद्रे असणार आहेत. फक्त मुंबईतच 10 हजारांपेक्षा जास्त मतदान केंद्रे असतील.
महापालिका निवडणुकीचं वेळापत्रक
- उमेदवारी अर्ज भरणे : 23 ते 30 डिसेंबर
- अर्जांची छाननी : 31 डिसेंबर
- अर्ज माघारी : 2 जानेवारी
- अंतिम उमेदवार यादी व चिन्ह वाटप : 3 जानेवारी
- मतदान : 15 जानेवारी
- निकाल : 16 जानेवारी
राज्यातील 27 महापालिकांची मुदत संपलेली आहे. त्याशिवाय जालना आणि इचलकरंजी या दोन नव्या महापालिकांच्या निवडणुकाही याच वेळी होणार आहेत. 1 जुलै 2025 रोजीची मतदार यादी या निवडणुकांसाठी ग्राह्य धरली जाणार असून, ही यादी केंद्र निवडणूक आयोगाकडून आलेली असल्याने त्यामध्ये बदल करता येणार नाही, असं आयोगाने स्पष्ट केलं आहे.
मुंबई महापालिकेत एक सदस्यीय वॉर्ड पद्धत असल्याने मतदारांना एकच मत द्यायचं आहे. तर उर्वरित 28 महापालिकांमध्ये वॉर्डनुसार एक ते पाच सदस्यांसाठी मतदान करावं लागणार आहे.
महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज फक्त ऑफलाईन पद्धतीनेच स्वीकारले जाणार आहेत. तसेच ज्या उमेदवारांकडे जात वैधता प्रमाणपत्र नाही, त्यांना निवडणुकीनंतर सहा महिन्यांच्या आत ते सादर करावं लागणार आहे.
ज्या 29 महापालिकांमध्ये निवडणूक होणार आहे त्यात-
मुंबई, पुणे, ठाणे, नागपूर, नाशिक, पिंपरी-चिंचवड, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, औरंगाबाद, सोलापूर, कोल्हापूर, सांगली, जालना, इचलकरंजी यांच्यासह राज्यातील मोठ्या आणि मध्यम शहरांचा समावेश आहे.






