मुंबई : अभिनेत्री प्राजक्ता माळी गेल्या काही दिवसांपूर्वी सुरेश धस प्रकरणामुळे चांगलीच चर्चेत आली होती. त्या प्रकरणानंतर प्राजक्ताने पहिल्यांदा मुलाखत दिली असून प्राजक्ताने पुन्हा एकदा महिलांची सुरक्षा आणि आदर याविषयी भाष्य केले आहे. बायकांना फक्त दोन गोष्टी हव्यात त्या मिळाल्या तर ती बाई इतरांसाठी फ्रंट सीटही सोडायला तयार होते, असं प्राजक्ता माळीने म्हटले आहे. प्राजक्ता नेमकं कोणत्या दोन गोष्टींबद्दल बोलली? जाणून घेऊया.

नेमकं काय म्हणाली प्राजक्ता माळी?
मुंबई मनोरंजन या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आलेल्या व्हिडिओमध्ये प्राजक्ता माळी म्हणाली की, “दोन गोष्टी महत्त्वाच्या आहेत. एक म्हणजे प्रेम आणि दुसरा म्हणजे आदर बायांना या दोन गोष्टी मिळाल्या तर बाई कुठल्याही लेव्हलला जाऊन तडजोड करून त्या पुरुषाला सपोर्ट करायला उभी राहते.”
प्राजक्ता पुढे म्हणाली की, “परंतु, प्रेम आणि आदर या दोन्ही गोष्टी आता थोड्या हलत आहेत. मग ती म्हणते की, “अरे मूर्खा तू जे करू शकतो त्यापेक्षा बेटर मी करू शकते. तुझ्यापेक्षा दुप्पट करू शकते, तू मला नको सांगू. तू थंड घे. तू घरी बस. तू मला शहाणपणा शिकवायचा नाही. मला माहिती आहे मी कोण आहे.” प्रत्येक बाईला माहिती असतं की किती केपेबल आहे.”
परंतु आपलं नेचर हुशार होतं..
“आपल्याकडे मातृसत्ताक पद्धती होती ती वेगवेगळ्या मोगल आक्रमणांनंतर सगळं गडबडलं गेलं. परंतु आपलं नेचर हुशार होतं. त्यांनी बायांना स्ट्रॉंग बनवलं ते अत्यंत महत्त्वाच्या कारणांसाठी. त्यामुळे मला असं वाटतं की बायांना प्रेम आणि योग्य रिस्पेक्ट मिळेल ना तर बाया दुसऱ्यांना फ्रंट सीटवर बसवायला तयार आहेत. कारण ते बाय डिफॉल्ट मॅकेनिजम आहे. परंतु या दोन गोष्टी नाही मिळाल्या तर ती चिडते मग ती चंडिका होते आणि मग तुम्ही तिच्या त्रिशूळाखाली मरता”, असंही प्राजक्ताने सांगितलं.







