सोलापूर: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला येथे दहावीच्या (SSC Exam) भूगोल विषयाचे 50 प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याची घटना समोर आल्यानंतर राज्यभरात खळबळ उडाली होती. उद्या होणारा पेपर पुढे ढकलला जाईल का, असा प्रश्न विद्यार्थी आणि पालकांमध्ये निर्माण झाला होता. मात्र सर्व संभ्रम दूर करत दहावीचा भूगोलाचा पेपर नियोजित वेळापत्रकानुसारच होणार असल्याचे पुणे एसएससी बोर्डाने स्पष्ट केले आहे. (Solapur News)

पुणे बोर्डाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णी यांनी विद्यार्थ्यांना आवाहन करत सांगितले की, पेपर वेळेवरच होईल आणि विद्यार्थ्यांनी कोणतीही भीती न बाळगता शांतपणे परीक्षा द्यावी. पेपर चोरीच्या घटनेनंतर तातडीने अहवाल मागवून परिस्थितीचा आढावा घेण्यात आला आणि परीक्षेवर कोणताही परिणाम होणार नाही, असा निर्णय घेण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणामुळे सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. चोरी गेलेल्या प्रश्नपत्रिकांचे फोटो किंवा झेरॉक्स बाहेर गेले असतील का, याबाबत शंका व्यक्त केली जात आहे. जर पेपर फुटल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवालही उपस्थित होत आहे.
या प्रकरणात शिक्षण विभागाने तत्काळ कारवाई करत प्रभारी शिक्षणाधिकारी सुयोग नवले आणि विद्यामंदिर प्रशालेचे मुख्याध्यापक अमोल गायकवाड यांना निलंबित केले आहे. तसेच, सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी आढळल्यास संबंधित पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांच्यावरही कारवाई होण्याची शक्यता आहे.
या घटनेने बोर्ड परीक्षांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. मात्र, प्रशासनाने परिस्थिती नियंत्रणात असल्याचे सांगत विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता अभ्यासावर लक्ष केंद्रित करण्याचे आवाहन केले आहे.






