Shrigonda : अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यात एका दुर्दैवी अपघातात दोन चिमुकल्यांचा जागीच अंत झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना घडली आहे. आईचा ट्रॅक्टरवरील ताबा सुटल्यामुळे हा अपघात झाला आणि ट्रॅक्टरखाली चिरडून तिच्या पोटच्या दोन लहानग्यांचा मृत्यू झाला. जनावरांसाठी चारा घेऊन शेतातून घरी परतत असताना ही मोठी दुर्घटना घडली, ज्यामुळे श्रीगोंदा तालुका शोक पसरला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार श्रीगोंदा तालुक्यातील उक्कडगाव येथील कावेरी किरण महाडिक (वय ३५) या आपल्या तीन मुलांसह ट्रॅक्टर घेऊन शेतात चारा आणण्यासाठी गेल्या होत्या. चारा घेऊन परत येत असताना गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास अचानक रस्त्यावर ट्रॅक्टरवरील त्यांचे नियंत्रण सुटले. यामुळे ट्रॅक्टर पलटी झाला. ट्रॅक्टरखाली दबून प्राप्ती किरण महाडिक (वय १०) आणि शिवांश किरण महाडिक (वय ४) या सख्ख्या बहीण-भावाचा जागीच मृत्यू झाला.
अपघात घडताच शेजारील नागरिक आणि ग्रामस्थांनी तात्काळ धाव घेतली. ट्रॅक्टरखाली गंभीररित्या दबलेल्या कावेरी महाडिक आणि त्यांची तिसरी मुलगी क्रांती महाडिक यांना बाहेर काढण्यात आले. दोघांनाही गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारासाठी शिरूर येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एका क्षुल्लक चुकीमुळे मातेच्या डोळ्यांदेखत दोन मुलांनी जीव गमावल्यामुळे संपूर्ण उक्कडगाव परिसरात खूप हळहळ व्यक्त होत आहे. पोलिसांनी या घटनेची नोंद घेऊन पुढील तपास सुरू केला आहे. Shrigonda






