Crime : मकरसंक्रांतीचा आनंद साजरा करण्यासाठी पुण्याहून मामाच्या गावी आलेल्या १४ वर्षीय मुलावर काळाने घाला घातल्याची हृदयद्रावक घटना अहिल्यानगर जिल्ह्यातील कोपरगाव शहरात घडली. पतंग उडवताना उच्चदाब वीजवाहिनीचा धक्का लागून अर्णव महेश व्यवहारे या चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर त्याचा १९ वर्षीय मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे संक्रांतीचा उत्साह क्षणात शोकात बदलला.

कोपरगाव शहरातील लक्ष्मीनगर भागात आज दुपारी सुमारे १ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. पिंपरी-चिंचवडमधील काळेवाडी फाटा परिसरात राहणारा अर्णव व्यवहारे हा मकरसंक्रांतीच्या निमित्ताने मंगळवारी सायंकाळी कोपरगाव येथे आपल्या मामा ओंकार काळे यांच्या घरी आला होता. संक्रांतीच्या दिवशी सकाळी अर्णव आपल्या मित्रांसोबत घराच्या गच्चीवर पतंग उडवत होता. त्याच्यासोबत ऋषिकेश वाघमारे (वय १९, रा. कोपरगाव) आणि इतर मित्रही उपस्थित होते.
पतंग उडवण्यासाठी बाइंडिंग तारचा वापर करण्यात आला होता. खेळाच्या नादात असताना अर्णवच्या हातातील तार घराशेजारी जाणाऱ्या हाय व्होल्टेज वीजवाहिनीच्या संपर्कात आली. जोरदार विद्युत धक्का बसताच अर्णव जागीच कोसळला. त्याला वाचवण्यासाठी धाव घेतलेल्या ऋषिकेशलाही विजेचा धक्का बसून तो गंभीर जखमी झाला.
घटनेनंतर परिसरात एकच गोंधळ उडाला. स्थानिक नागरिकांनी तातडीने दोघांना रुग्णालयात दाखल केले. मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर अर्णवचा मृत्यू झाल्याचे जाहीर केले. ऋषिकेशवर सध्या उपचार सुरू असून त्याची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

सणासाठी मोठ्या आनंदाने कोपरगावात आलेल्या अर्णवचा असा दुर्दैवी अंत झाल्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. लक्ष्मीनगर परिसरासह संपूर्ण कोपरगाव शहरात हळहळ व्यक्त केली जात असून, पतंग उडवताना धोकादायक तारांचा वापर टाळावा आणि वीजवाहिन्यांजवळ विशेष काळजी घ्यावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.





