पुणे: महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यांच्या सीमेवर वसलेल्या १४ गावांच्या महाराष्ट्रातील समावेशाचा मार्ग अखेर अनेक वर्षांच्या प्रतीक्षेनंतर मोकळा झाला आहे. मुख्यमंत्रींच्या निर्देशानंतर या १४ गावांचा चंद्रपूर जिल्ह्यातील राजुरा आणि जिवती तालुक्यांत समावेश करण्याच्या प्रशासकीय प्रक्रियेला वेग आला आहे. विधानभवनात महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात याच संदर्भात, नुकतीच एक महत्त्वाची बैठक पार पडली असून बैठकीत राजुरा मतदारसंघाचेजिवती तालुक्यातील १४ गावांचे प्रतिनिधी, आमदार देवराज भोंगळे, आणि चंद्रपूरचे जिल्हाधिकारी विनय गौडा हे सर्व जण उपस्थित होते. दरम्यान, या गावांना महाराष्ट्रात समाविष्ट करण्याचे स्पष्ट आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्याने, सीमाभागातील नागरिकांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

या भेटीदरम्यान गावकऱ्यांनी महाराष्ट्रात येण्याची त्यांची दीर्घकाळची मागणी आणि त्यामागील अडचणी स्पष्ट केल्या. गावकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महसूलमंत्री बावनकुळे यांनी तात्काळ प्रशासनाला आवश्यक ती प्रक्रिया युद्धपातळीवर सुरू करण्याचे निर्देश दिले.
विकासाची दारे खुली; शासनाच्या योजनांचा लाभ मिळणार
राज्य सरकारच्या या निर्णयामुळे, आता या सीमावर्ती गावांना महाराष्ट्राच्या सर्व शासकीय योजना, दर्जेदार पायाभूत सुविधा, उत्तम शिक्षण, आरोग्य सेवा, सुस्थितीतले रस्ते आणि नियमित पाणीपुरवठा यांसारख्या मूलभूत सोयी-सुविधांचा लाभ मिळणार आहे. अनेक वर्षांपासून महाराष्ट्रात सामील होण्याची येथील ग्रामस्थांची मागणी होती, जी आता पूर्णत्वास येत आहे. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयानंतर, महाराष्ट्रातील अधिकृत समावेशाची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध होईल. या निर्णयामुळे अनेक वर्षांपासून पायाभूत सुविधा मिळत नसलेल्या या गावांमध्येही विकासाची गंगा वाहणार असून अनेक प्रश्न सुटणार हे नक्की आहे.







