Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील यांच्या हत्येचा कट रचल्याचा आरोप राज्यात मोठ्या वादाचा मुद्दा ठरत आहे. या प्रकरणात जालना पोलिसांनी दोन संशयितांना ताब्यात घेतल्यानंतर जरांगे पाटील यांनी थेट अजित पवार गटाचे नेते आणि आमदार धनंजय मुंडे यांच्यावरच गंभीर आरोप केला.

“माझ्या हत्येची सुपारी धनंजय मुंडे यांनी दिली,” असा खळबळजनक दावा जरांगे यांनी केला होता. या आरोपांनंतर आता धनंजय मुंडेंनी पत्रकार परिषद घेत मनोज जरांगे पाटलांवर प्रत्युत्तरात्मक हल्लाबोल केला आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना मुंडे म्हणाले, “मुख्यमंत्र्यांना वाईट वाटेल पण पोलिस यंत्रणा काहींच्या दबावाखाली काम करत आहे. जे काही घडतंय त्यामागे काही मोजके लोक आहेत, आणि प्रत्येक गोष्टीत टार्गेट मात्र धनंजय मुंडेच का? मी एवढा आवरत नाही का?” असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
ते पुढे म्हणाले, “त्या सभेत मी ईडब्ल्यूएस आणि ओबीसींच्या प्रश्नावर बोललो म्हणून का राग आला? की मी चष्मा पाठवला नाही म्हणून एवढा मोठा मुद्दा करण्यात आला? एवढ्या किरकोळ गोष्टींवरून आरोप करणं हास्यास्पद आहे.”
जरांगे यांच्या आरोपांना उत्तर देताना मुंडे म्हणाले, “माझ्यामुळे आता संपूर्ण पृथ्वीच धोक्यात आली आहे असं वाटतं. मी काय कोव्हिड व्हायरस झालो आहे का? मुख्यमंत्र्यांपासून मंत्र्यांपर्यंत सर्वांवर खुलेआम आरोप केले जात आहेत. पण आम्हीही एवढे बुळे नाही की हे सगळं समजणार नाही.”
पुढे ते म्हणाले, “आज दादागिरी सुरू आहे. अंतरवलीतूनच अंतर वाढत आहे. तुमच्या मेव्हण्याचे वाळूचे ट्रक किती पकडले गेले? मी सरकारला विचारणार आहे. सामान्य माणसावर लगेच कारवाई होते, पण या प्रकरणात मौन का?” असा सवाल मुंडेंनी उपस्थित केला.
या आरोप-प्रत्यारोपामुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखी तापलं आहे. जरांगे-मुंडे संघर्ष आता केवळ वक्तव्यांपुरता न राहता राजकीय वादळात रूपांतरित होण्याची चिन्हे स्पष्ट दिसत आहेत.







