Crime News: नांदेड : जिल्ह्यातील अर्धापूर येथे अत्यंत संतापजनक घटना घडली आहे. भांडण सोडवण्यासाठी गेलेल्या एका 25 वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या (Murder) करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेमुळे शहरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यंकटी चांदू वाघमारे असे मृत तरुणाचे नाव असून, तो अर्धापूरमधील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर भागात राहत होता. (Crime News)

मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना शुक्रवारी संध्याकाळी सुमारे 7.30 ते 8.00 वाजण्याच्या दरम्यान घडली. त्या वेळी व्यंकटी आपल्या घरी जेवण करत होता. दरम्यान, घराबाहेर काही लोकांमध्ये वाद सुरू असल्याचा आवाज त्याला ऐकू आला. ‘आमच्या घरावर दगड का फेकले?’ या कारणावरून हा वाद सुरू होता. हा वाद वाढत असल्याचे पाहून व्यंकटी भांडण थांबवण्यासाठी आणि दोन्ही बाजूंना समजावण्यासाठी बाहेर गेला.
तरुणावर हल्ला
मात्र, संशयित आरोपींनी संगनमत करून व्यंकटीवरच हल्ला केला. आरोपींनी त्याला लाथाबुक्क्यांनी जोरात मारहाण केली. त्यानंतर त्याचे डोके रस्त्यावरील सिमेंटच्या दुभाजकावर आपटले. या गंभीर मारहाणीमुळे व्यंकटी गंभीर जखमी झाला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली.
गुन्हा दाखल
या प्रकरणी व्यंकटीच्या पत्नीने दिलेल्या तक्रारीवरून अर्धापूर पोलीस ठाण्यात चार जणांविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मधू तांदुळकर, गणेश तांदुळकर, मारुती तांदुळकर आणि लता तांदुळकर अशी आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी यातील तिघांना ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, घटनेची माहिती मिळताच व्यंकटीच्या नातेवाइकांनी संताप व्यक्त केला. काही संतप्त नातेवाइकांनी आरोपींच्या घरावर हल्ला करण्याचा आणि घर जाळण्याचा प्रयत्न केला. तसेच परिसरातील काही दुचाकींची तोडफोड करण्यात आली. या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली असून, परिसरात बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.







