Crime News: बीड : मुलगा होत नसल्याच्या कारणावरून एका विवाहितेला छळ सहन करावा लागल्याची धक्कादायक घटना बीड (Beed) जिल्ह्यात समोर आली आहे. सततच्या मानसिक आणि शारीरिक त्रासाला कंटाळून म्हाळसापूर येथील भक्ती अमोल कोरडे या विवाहितेने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. गेल्या महिनाभरापासून उपचार सुरू असताना अखेर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

माहितीनुसार, भक्ती कोरडे हिचा विवाह म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. त्यांच्या संसारात तीन मुलींचा जन्म झाला. मात्र मुलगा नसल्याच्या कारणावरून सासरच्या मंडळींकडून तिचा छळ केला जात असल्याचा आरोप आहे. पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे हे मागील अडीच वर्षांपासून तिला मुलगा होत नसल्याचे कारण देत त्रास देत होते, अशी माहिती तक्रारीत नमूद आहे.
इतकेच नव्हे तर पतीला दुसरे लग्न करण्यासाठी परवानगी द्यावी, असा दबावही तिच्यावर टाकला जात होता. दुसऱ्या लग्नासाठी संमती देऊन तसे लिखित स्वरूपात देण्यास भाग पाडले जात असल्याचेही समोर आले आहे. या कारणावरून तिच्यावर वारंवार मारहाण आणि मानसिक छळ केला जात असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
सततच्या त्रासाला कंटाळून भक्ती कोरडे यांनी 2 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यानंतर तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती गंभीर असल्याने पुढे तिला खासगी रुग्णालयात हलवण्यात आले होते. डॉक्टरांनी तिच्यावर उपचार केले, मात्र महिनाभराच्या उपचारानंतर 6 मार्च रोजी तिचा मृत्यू झाला.
या प्रकरणी भक्तीच्या आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास सुरू आहे.






