Maharashtra Legislative Council: महारष्ट्राच्या राजकारणात पुढच्या 2 महिन्यांमध्ये मोठ्या घडामोडी पाहायला मिळणार आहेत. राज्याच्या विधिमंडळाला लवकरच 16 नवे आमदार मिळणार असल्याने राजकीय वर्तुळात आतापासूनच हालचालींना वेग आला आहे. या 16 जागांपैकी 14 जागा विधानपरिषदेच्या आहेत, तर 2 जागा विधानसभेच्या पोटनिवडणुकीद्वारे भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे काही जागांसाठी निवडणुकीची तयारी प्रशासकीय पातळीवर आधीच सुरू झाली आहे.

विधानपरिषदेचा विचार केला तर विधानसभेतून निवडून गेलेल्या 9 आमदारांचा कार्यकाळ येत्या 13 मे रोजी संपत आहे. या जागांसाठी 15 एप्रिलच्या सुमारास निवडणुकीची घोषणा होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त काँग्रेसमधून राजीनामा देऊन भाजपमध्ये गेलेल्या प्रज्ञा सातव यांची रिक्त झालेली जागाही भरली जाणार आहे. तसेच स्थानिक स्वराज्य संस्था गटातील पुणे, सोलापूर, सांगली-सातारा आणि रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग या महत्त्वाच्या चार मतदारसंघांमधील निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरू होऊ शकते. निवडणूक आयोगाकडून या मतदारसंघातील मतदारांची अद्ययावत यादी प्रसिद्ध करण्याचे काम सुरू आहे.
दुसरीकडे विधानसभेच्या 2 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडणार आहे. राहुरीचे आमदार शिवाजीराव कर्डिले यांच्या निधनानंतर रिक्त झालेल्या राहुरी आणि अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघातही पोटनिवडणूक होणार आहे. राहुरीमध्ये भाजपकडून अक्षय कर्डिले यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, तर बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीची चर्चा रंगली आहे. दोन्ही मतदारसंघात सध्या मतदार याद्यांच्या पुनरावलोकनाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. यामुळे येत्या काळात राज्याचे राजकीय वातावरण चांगलेच तापणार असल्याचे दिसत आहे.





