Accident News: रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात मुंबई-गोवा महामार्गावर झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. भरधाव वेगातील दुचाकीवरील ताबा सुटल्याने हा अपघात (Accident) झाला. या अपघातात अद्वैत प्रवीण गीते या तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून त्याचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अद्वैत गीते हा शनिवारी रात्री सुमारे 11 वाजण्याच्या सुमारास आपल्या एका मित्रासोबत दुचाकीवरून मुंबई-गोवा महामार्गावरून कळंबणीच्या दिशेने जात होता. भरणे-शिंदेवाडी परिसरात आल्यानंतर अचानक दुचाकीवरील ताबा सुटला. त्यामुळे दुचाकी रस्त्यावर घसरली आणि दोघेही रस्त्यावर फेकले गेले. या अपघातात अद्वैत रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर आदळला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला.
अद्वैत गीते हा खेड तालुक्यातील तिसंगी गावचा रहिवासी होता. त्याचे वडील प्रवीण गीते हे नवभारत हायस्कूलमध्ये शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. अद्वैत आपल्या मित्रांसोबत रात्रीच्या जेवणासाठी कळंबणी येथे जात असताना हा अपघात घडला. या घटनेची माहिती मिळताच नातेवाईक, मित्र आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने घटनास्थळी जमा झाले.
या अपघातात दुचाकीवर मागे बसलेला अद्वैतचा मित्र गंभीर जखमी झाला आहे. त्याला तातडीने कळंबणी येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सध्या त्याच्यावर डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी खेड पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्याची प्रक्रिया सुरू आहे. एकुलत्या एक मुलाचा अपघातात मृत्यू झाल्याने गीते कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून परिसरात शोककळा पसरली आहे.





