U19 Asia Cup Cricket : संयुक्त अरब अमिरातीच्या (UAE) मैदानावर पुन्हा एकदा भारतीय क्रिकेटचा डंका वाजवण्यासाठी आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखालील ‘यंग ब्रिगेड’ सज्ज झाली आहे. अवघ्या ८१ दिवसांपूर्वी वरिष्ठ भारतीय संघाने याच भूमीवर पाकिस्तानला नमवून आशिया चषक उंचावला होता. आता तोच इतिहास अंडर-१९ क्रिकेटमध्ये पुन्हा घडवण्याची सुवर्णसंधी टीम इंडियाकडे चालून आली आहे. स्पर्धेच्या उपांत्य फेरीचे चित्र स्पष्ट झाले असून, भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकदा अंतिम फेरीत समोरासमोर येण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. या संभाव्य महामुकाबल्यामुळे क्रिकेट चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता पाहायला मिळत आहे. (U19 Asia Cup Cricket)

अंडर-१९ आशिया चषक २०२५ च्या उपांत्य फेरीचे समीकरण अत्यंत रोमांचक वळणावर आहे. येत्या १९ डिसेंबर रोजी दोन महत्त्वाचे सामने पार पडणार आहेत. पहिल्या उपांत्य सामन्यात बलाढ्य भारतीय संघाचा मुकाबला श्रीलंकेशी होईल, तर दुसऱ्या सामन्यात गतविजेता बांगलादेश पाकिस्तानच्या आव्हानाला सामोरे जाईल. जर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांनी आपापले सामने जिंकले, तर २१ डिसेंबर रोजी होणारा अंतिम सामना म्हणजे क्रिकेट विश्वातील सर्वात मोठा थरार ठरेल. विशेष म्हणजे, ग्रुप स्टेजमधील कामगिरी पाहता टीम इंडियाचे पारडे सध्या जड मानले जात आहे.
स्पर्धेच्या गट फेरीत भारतीय संघाने ज्या पद्धतीने पाकिस्तानचा धुव्वा उडवला, तो पाहता भारतीय खेळाडूंचा आत्मविश्वास उंचावलेला आहे. १४ डिसेंबर रोजी झालेल्या त्या सामन्यात भारताने पाकिस्तानवर ९० धावांनी दणदणीत विजय मिळवला होता. प्रथम फलंदाजी करताना आरोन जॉर्जच्या ८५ आणि कनिष्क चौहानच्या ४६ धावांच्या जोरावर भारताने २४० धावा उभारल्या होत्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा डाव अवघ्या १५० धावांत गुंडाळण्यात भारतीय गोलंदाजांना यश आले होते. कनिष्क चौहान, दीपेश देवेंद्रन आणि किशन सिंग यांच्या धारदार गोलंदाजीसमोर पाकिस्तानने पूर्णपणे नांगी टाकली होती.
आता साऱ्या नजरा १९ डिसेंबरच्या उपांत्य फेरीवर खिळल्या आहेत. भारतीय चाहत्यांना हा रोमांचक सामना स्टार स्पोर्ट्स नेटवर्कच्या विविध वाहिन्यांवर थेट पाहता येईल, तर डिजिटल प्रेक्षकांसाठी ‘जिओ हॉटस्टार’वर थेट प्रक्षेपणाची सोय करण्यात आली आहे. जर समीकरणे जुळून आली, तर रविवारी दुबईच्या मैदानावर पुन्हा एकदा ‘इंडिया-पाकिस्तान’ हा हाय-व्होल्टेज ड्रामा अनुभवता येईल. आयुष म्हात्रेचा संघ आशिया चषकाची ही ट्रॉफी उंचावून भारतीय क्रिकेटच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवण्यासाठी सज्ज झाला आहे.







