Shubhman Gill : भारत आणि न्यूझीलंड यांच्यात लवकरच एकदिवसीय आणि टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेसाठी आज भारताचा एकदिवसीय संघ जाहीर होणार आहे. पण संघ जाहीर होण्याआधीच एक महत्त्वाची घडामोड समोर आली आहे. त्यामुळे एकदिवसीय संघाचं नेतृत्व पुन्हा केएल राहुलकडे जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Shubhman Gill)

सध्याचा एकदिवसीय कर्णधार शुभमन गिल अजून पूर्णपणे तंदुरुस्त नसल्याची माहिती मिळतेय. विजय हजारे ट्रॉफीमध्ये सिक्कीमविरुद्ध खेळून तो मैदानात परतणार होता, पण प्रत्यक्षात तो सामना खेळू शकला नाही. पंजाबकडून खेळण्याची तयारी असतानाच सामन्याआधी गिल आजारी पडला आणि त्याला बाहेर बसावं लागलं.
मिळालेल्या माहितीनुसार, शुभमन गिलला अन्नातून विषबाधा झाली होती. त्यामुळे त्याला लगेच खेळण्याचा धोका न घेता विश्रांती देण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. तो शुक्रवारी रात्री चंदीगडहून जयपूरला पोहोचला असून आता 6 जानेवारी रोजी गोवाविरुद्ध होणाऱ्या पुढील सामन्यात तो खेळेल अशी अपेक्षा आहे.
गिल आजारी असल्याची बातमी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारत-न्यूझीलंड एकदिवसीय मालिकेसाठी संघ जाहीर होणार आहे. त्यामुळे तो या मालिकेसाठी फिट होईल की नाही, याबाबत शंका निर्माण झाली आहे.
लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे, शुभमन गिलला गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये भारताच्या एकदिवसीय संघाचा कर्णधार बनवण्यात आलं होतं. पण त्यानंतर दुखापती आणि आरोग्याच्या समस्यांमुळे तो फारसे सामने खेळू शकलेला नाही. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्याने फक्त तीन सामने खेळले, तर दुखापतीमुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धची एकदिवसीय मालिका त्याला गमवावी लागली होती.
आता सगळ्यांचं लक्ष आहे ते म्हणजे, शुभमन गिल वेळेत तंदुरुस्त होतो का आणि भारत-न्यूझीलंड मालिकेत तो संघाचं नेतृत्व करतो का, याकडे.







