Ind vs Pak T20 World Cup 2026 : आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मधील सर्वात चर्चेत असलेल्या भारत-पाकिस्तान सामन्याबाबत अद्याप अनिश्चिततेचं वातावरण कायम आहे. पाकिस्तान भारताविरुद्ध सामना खेळण्यास नकार देणार, अशी जोरदार चर्चा सुरू असली तरी पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (PCB) यासंदर्भात आयसीसीकडे कोणतीही अधिकृत लेखी भूमिका मांडलेली नाही. त्यामुळे 15 फेब्रुवारी रोजी होणारा बहुप्रतिक्षित भारत-पाकिस्तान सामना पूर्णपणे रद्द होईल, असं ठामपणे म्हणता येत नाही.

हा सामना केवळ दोन संघांमधील लढत नसून तो आयसीसीसाठी सर्वाधिक महसूल, प्रेक्षकसंख्या आणि जागतिक लक्ष वेधून घेणारा सामना मानला जातो. याच कारणामुळे आयसीसीकडून हा सामना घडवून आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर प्रयत्न सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर 8 फेब्रुवारी रोजी आयसीसी आणि पीसीबी अध्यक्ष मोहसिन नक्वी यांच्यात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीला बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे अध्यक्षही उपस्थित होते.
या बैठकीत पाकिस्तानने भारताविरुद्धचा संभाव्य बॉयकॉट मागे घेण्यासाठी आयसीसीसमोर तीन अटी ठेवल्याची माहिती समोर आली आहे. पहिली अट म्हणजे आयसीसीकडून पाकिस्तानला अधिक महसूल वाटा द्यावा. दुसरी अट भारत-पाकिस्तान दरम्यान द्विपक्षीय क्रिकेट मालिका पुन्हा सुरू करण्याची आहे. तिसरी अट म्हणजे टी-20 विश्वचषकादरम्यान भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन करावे.
यातील दुसरी मागणी भारतासाठी पूर्णपणे अमान्य असल्याचं स्पष्ट चित्र आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात शेवटची द्विपक्षीय मालिका 2012 मध्ये झाली होती. त्यानंतरच्या 16 वर्षांत राजकीय आणि सुरक्षेच्या कारणांमुळे दोन्ही देशांचे संघ फक्त आयसीसी किंवा आशियाई स्पर्धांमध्येच आमनेसामने आले आहेत.
विशेष म्हणजे, मागील वर्षी झालेल्या पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताची पाकिस्तानविषयी भूमिका अधिक कठोर झाली. यानंतर आशिया कप 2025 पासून भारतीय संघाने पाकिस्तानी खेळाडूंशी हस्तांदोलन न करण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे महसूल वाटप किंवा औपचारिक बाबींवर चर्चा होऊ शकते, मात्र द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू होण्याची पाकिस्तानची अपेक्षा सध्या तरी वास्तवापासून दूर असल्याचं दिसत आहे.
अशा स्थितीत आयसीसी तोडगा काढते की राजकीय वास्तवामुळे भारत-पाकिस्तान सामना टळतो, हे पाहणं आता क्रिकेटविश्वासाठी औत्सुक्याचं ठरणार आहे.







