Yerwada to Katraj: पुणे : पुणे शहरातील वाढती वाहतूक कोंडी (Traffic) कमी करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने एक महत्त्वाचा प्रकल्प पुढे आणला आहे. येरवडा ते कात्रज दरम्यान सुमारे 20 किलोमीटर लांबीचा थेट भुयारी मार्ग उभारण्याचा प्रस्ताव सध्या विचाराधीन आहे. या प्रकल्पाची व्यवहार्यता तपासण्याचे काम सुरू असून प्राथमिक अंदाजानुसार या भुयारी महामार्गासाठी सुमारे 7500 कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. Pune News

हेही वाचा- स्वप्नातल्या घराला रक्ताचा रंग! पुण्यातल्या बंगल्यात 2 जणांसोबत घडलं भयंकर; नेमकं प्रकरण काय? वाचा
पुणे शहरात वाहनांची संख्या झपाट्याने वाढत आहे. मात्र शहरातील अनेक भागात रस्ते रुंदीकरणासाठी जागेची मर्यादा असल्याने नव्या पर्यायांचा शोध घेतला जात आहे. या पार्श्वभूमीवर जमिनीखालून जाणारा भुयारी मार्ग हा पर्याय पुढे आणण्यात आला आहे. हा मार्ग पूर्ण झाल्यास पुण्याच्या उत्तर आणि दक्षिण भागांमधील प्रवास अधिक वेगवान आणि सोपा होणार आहे.
प्रस्तावित भुयारी मार्ग शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या मध्यवर्ती भागातून जाणार आहे. या मार्गावर दोन्ही बाजूंनी वाहनांची ये-जा होईल, अशी रचना करण्याचा विचार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक थेट जमिनीखालून वाहू शकणार असून जमिनीवरील रस्त्यांवरील ताण कमी होण्यास मदत होणार आहे.
या प्रकल्पाच्या अभ्यास अहवालात मार्गाची सुरुवात आणि शेवट कुठे असेल, मधल्या टप्प्यांवर बाहेर पडण्यासाठी कोणते पर्याय असतील, एकूण खर्च किती येईल, तसेच हा मार्ग सातारा आणि नगर महामार्गाशी कसा जोडता येईल, याचा सविस्तर विचार केला जाणार आहे. याशिवाय हा प्रकल्प खासगी भागीदारी तत्त्वावर राबवता येईल का, याचीही तपासणी करण्यात येणार आहे.
हा भुयारी मार्ग पूर्ण झाल्यानंतर येरवडा ते कात्रज हे अंतर अवघ्या अर्ध्या तासात पार करणे शक्य होईल. त्यामुळे प्रवासाचा वेळ कमी होईल, इंधनाची बचत होईल आणि वायू व ध्वनी प्रदूषणातही घट होण्यास मदत होणार आहे. पुणे शहराच्या भविष्यातील वाहतूक व्यवस्थेसाठी हा प्रकल्प महत्त्वाचा ठरणार आहे.





