शिरूर,ता.१८: प्रभू श्री.रामांनी स्थापन केलेल्या रामलिंग(जुने शिरूर) येथील श्री.रामलिंग महाराजांच्या पुरातन पिंडीला वज्रलेप करण्यात येणार असल्यामुळे रामलिंग मंदीर २ मे ते ९ मे पर्यंत बंद राहणार असल्याची माहीती रामलिंग देवस्थानच्या वतीने देण्यात आली आहे. श्री.रामलिंग महाराज हे रामलिंग गावासह(जुने शिरूर)शिरूर शहर आणि पंचक्रोशीचे आराध्य दैवत आहे. तसेच परिसरासह तालुक्यातील नागरिकांचे मोठे श्रद्धास्थान आहे. त्यामुळे येथे कायमच भाविक-भक्तांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. पिंडीला वज्रलेप लावणार असल्यामुळे श्री.रामलिंग महाराजांच्या मूळ पिंडीचे संरक्षण होणार आहे. त्यामुळे अनेक भाविक-भक्त व येथील परिसरातील नागरिक समाधानी असल्याच्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
वज्रलेप का करतात?
“वज्रलेपामुळे मूर्तीची झीज कमी होते आणि ती अधिक काळ टिकून राहते.तसेच वज्रलेप केल्याने मूर्तीला नवीन आणि आकर्षक स्वरूप प्राप्त होते.त्याचप्रमाणे वज्रलेपामुळे मूर्तीवर धूप,वारा आणि इतर नैसर्गिक घटकांचा परिणाम कमी होतो,ज्यामुळे मूर्तीची झीज कमी होते.”
वज्रलेप प्रक्रिया कशी असते?
“वज्रलेप प्रक्रिया सुरू होण्यापूर्वी मूर्तीला पूर्णपणे स्वच्छ केले जाते.
वज्रलेप देण्यासाठी विशेष रसायने आणि मोत्यांची भुकटी वापरली जाते.
या मिश्रणाने मूर्तीला लेप दिला जातो,ज्यामुळे ती मूर्ती(पिंड)अधिक टिकाऊ आणि आकर्षक दिसते.”
रामलिंग देवस्थानचे अध्यक्ष आणि प्रसिध्द उद्योगपती प्रकाशशेठ धारीवाल यांनी नागरिक व भाविक-भक्तांना आवाहन करताना सांगितले की,रामलिंग महाराजांच्या पिंडीला वज्रलेप होणार असून,या कालावधीमध्ये नागरिक आणि भाविक-भक्तांनी मंदिर बंदच्या काळात देवस्थान समितीला सहकार्य करावे.