यवत: जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात नुकताच झालेला भीषण दहशदवादी हल्ला हा अत्यंत दुःखद व चिंताजनक प्रकार आहे. या घटनेमुळे संपूर्ण देशभरात भीतीच व तणावाचे वातावरण निर्माण झालं आहे. या परिसरात पर्यटनासाठी गेलेले नागरिक देखील भयभीत झाले आहे. दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यासह पुणे जिल्ह्यातील अनेक पर्यटक सध्या जम्मू-काश्मीरमध्ये अडकलेले आहेत. त्यांच्या परिवारांमध्ये चिंतेचं वातावरण असून, त्यांना सुखरूप परत घेऊन येण्यासाठी त्यांचे कुटुंबीय वारंवार पाठपुरावा करीत असून याबाबत सहकार व हवाई वाहतूक केंद्रीय राज्यमंत्री मुरली मोहोळ यांच्याशी संपर्क व पत्रव्यवहार केला असल्याची माहिती आमदार राहुल कुल यांनी दिली.
जम्मू-काश्मीर प्रशासन व संबंधित यंत्रणांशी तात्काळ संपर्क साधून पुण्यातील अडकलेल्या पर्यटकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यात कृपया पुढाकार घ्यावा. तसेच, या पर्यटकांना त्यांच्या मूळ गावी सुखरूप पोहोचविण्यासाठी विशेष मदतीची व्यवस्था करण्यात यावी अशी मागणी आमदार राहुल कुल यांनी केली आहे.
याबाबत मुरलीधर मोहोळ यांनी सकारात्मक कार्यवाहीचे आश्वासन दिले असून लवकर सर्व पर्यटक सुखरूप आपल्या घरी पोहचतील असा विश्वास व्यक्त केला.
आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून तातडीने कारवाई व्हावी
जम्मू-काश्मीरमधील पहलगाम परिसरात अडकलेल्या पुणे जिल्ह्यातील तसेच दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील पर्यटकांना सुखरूप परत घेऊन येण्यासाठी जिल्ह्याच्या आपत्ती निवारण कक्षाच्या माध्यमातून तातडीने कार्यवाही करण्यात यावी यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुड्डी साहेब यांची भेट घेऊन आमदार राहुल कुल यांनी निवेदन दिले आहे.
दौंड, हवेली व इंदापूर तालुक्यातील पर्यटनासाठी गेलेले सुमारे 85 हुन अधिक नागरिक जम्मू-काश्मीर येथे अडकले असून ते सर्वजण सुखरुप आहेत. काही नागरिकांशी माझा संपर्क झाला असून सर्वांना सुखरुप घरी परत आणण्यासाठी सर्व प्रकारचे प्रयत्न सुरु असल्याचे आमदार राहुल कुल यांनी सांगितले.