पुणे: राज्य शासनाच्या अंत्योदय आणि प्राधान्य कुटुंब योजनेअंतर्गत रेशनकार्डधारकांना दरमहा गहू आणि तांदूळ दिला जातो. मात्र मार्च महिन्यापासून या वितरणात महत्त्वाचा बदल करण्यात आला आहे. तांदळाऐवजी (Ration Card) लाभार्थ्यांना गव्हासोबत मका देण्याचा निर्णय घेण्यात आला असून हा बदल पुढील तीन महिन्यांसाठी लागू राहणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील लाखो कुटुंबांच्या शिध्यात तात्पुरता बदल होणार आहे.

अहिल्यानगर जिल्हा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशनमार्फत आठ खरेदी केंद्रांवर मका खरेदी सुरू आहे. आतापर्यंत सुमारे 15 हजार क्विंटल मका खरेदी करण्यात आली असून 28 फेब्रुवारीपर्यंत ही प्रक्रिया सुरू राहणार आहे. खरेदी केलेला मका रेशन दुकानांमार्फत थेट लाभार्थ्यांना वितरित केला जाणार आहे. शासनाच्या सूत्रांनुसार, साठा व्यवस्थापन आणि स्थानिक पातळीवरील उपलब्धतेचा विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे.
अंत्योदय योजनेतील कुटुंबांना दरमहा 10 किलो मका आणि 11 किलो गहू दिला जाईल. तर प्राधान्य कुटुंब योजनेतील लाभार्थ्यांना प्रति व्यक्ती 2 किलो गहू आणि 1 किलो मका मिळणार आहे. जिल्ह्यात अंत्योदय योजनेचे 87 हजार 64 रेशनकार्डधारक असून एकूण 3 लाख 86 हजार 34 लाभार्थी आहेत. प्राधान्य कुटुंब योजनेत 6 लाख 37 हजार 114 रेशनकार्डधारक आणि 25 लाख 63 हजार 971 लाभार्थी आहेत. या सर्वांना नव्या पद्धतीने मका वाटप होणार आहे.
मात्र या निर्णयामुळे काही लाभार्थ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. “मकाचे काय करायचे?” असा प्रश्न अनेकांकडून विचारला जात आहे. ग्रामीण भागात मक्याचे पीठ, भाकरी किंवा धान्याच्या स्वरूपात वापर सामान्य असला, तरी शहरी कुटुंबांना त्याचा वापर कसा करावा याबाबत माहिती कमी आहे. अन्नपदार्थांच्या बदलत्या सवयी आणि तांदळाच्या सवयीमुळे हा बदल स्वीकारणे काहींसाठी आव्हानात्मक ठरू शकते.
नगर, घारगाव, श्रीगोंदा, घोगरगाव, मिरजगाव, शेवगाव, पाथर्डी आणि कोपरगाव येथे खरेदी सुरू असताना जामखेड आणि संगमनेर येथे अद्याप नोंदणी झालेली नसल्याची माहिती आहे. पुढील तीन महिने हा प्रयोग कसा राबवला जातो आणि लाभार्थ्यांचा प्रतिसाद कसा मिळतो, याकडे प्रशासनाचे लक्ष लागले आहे.







