Pune News : ख्रिसमस, नववर्ष आणि हिवाळी सुट्ट्यांमुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांची मोठी गर्दी होत आहे. ही गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने काही विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर-हडपसर, पुणे-नागपूर आणि मध्य प्रदेशातील राणी कमलापती (भोपाळ)-हडपसर या मार्गांवर या विशेष गाड्या धावणार असून प्रवाशांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे. या सर्व गाड्यांची ऑनलाइन तिकीट बुकिंग प्रक्रिया सुरू झाली आहे. (Pune News)

नियोजन काय आहे?
गाडी क्रमांक 01221 नागपूर-हडपसर विशेष गाडी 29 आणि 31 डिसेंबर तसेच 2 जानेवारी रोजी नागपूरहून रात्री 7.40 वाजता सुटणार आहे. ही गाडी दुसऱ्या दिवशी सकाळी 11.25 वाजता हडपसरला पोहोचेल. याउलट, 01222 हडपसर-नागपूर विशेष गाडी 28 व 30 डिसेंबर तसेच 1 आणि 4 जानेवारीला हडपसरहून दुपारी 3.50 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 6.30 वाजता नागपूरला पोहोचेल. या गाड्यांना अजनी, वर्धा, धामणगाव, बडनेरा, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहिल्यानगर, दौंड कॉर्डलाइन आणि उरुळी असे थांबे देण्यात आले आहेत.
तसेच गाडी क्रमांक 01419 पुणे-नागपूर विशेष गाडी 27, 29, 31 डिसेंबर आणि 3 जानेवारीला पुण्याहून रात्री 8.30 वाजता सुटणार असून दुसऱ्या दिवशी दुपारी 2.05 वाजता नागपूरला पोहोचेल. तर 01420 नागपूर-पुणे विशेष गाडी 28, 30 डिसेंबर तसेच 1 आणि 4 जानेवारीला नागपूरहून दुपारी 4.10 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी सकाळी 11.45 वाजता पुण्यात येईल.
याशिवाय मध्य प्रदेशातील राणी कमलापती (भोपाळ) ते हडपसर या मार्गावरही विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 02156 राणी कमलापती-हडपसर विशेष गाडी 27 डिसेंबर तसेच 3 आणि 10 जानेवारीला सकाळी 8.40 वाजता सुटून दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 12.10 वाजता हडपसरला पोहोचेल. तर 02155 हडपसर-राणी कमलापती विशेष गाडी 28 डिसेंबर तसेच 4 आणि 11 जानेवारीला सकाळी 7.50 वाजता सुटून त्याच दिवशी रात्री 11.40 वाजता राणी कमलापती येथे पोहोचेल. या गाडीला नर्मदापुरम, इटारसी, खंडवा, भुसावळ, मनमाड, कोपरगाव, अहिल्यानगर आणि दौंड कॉर्डलाइन असे थांबे असतील.
दरम्यान, सुट्ट्यांच्या काळात पुणे विभागातून धावणाऱ्या अनेक लांब पल्ल्याच्या गाड्या सातत्याने काही तास उशिराने धावत असल्याने प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत. पर्यटनासाठी किंवा गावी जाण्यासाठी अनेकांनी दोन महिने आधीच तिकीट बुकिंग केलं असलं तरी गाड्यांच्या उशिरामुळे त्यांचे नियोजन कोलमडत आहे. पुण्यातून दिल्ली, पाटणा, कोलकाता, इंदूर, जबलपूर, कन्याकुमारी अशा महत्त्वाच्या ठिकाणांसाठी जाणाऱ्या गाड्यांना सध्या प्रचंड गर्दी आहे.
काही ठिकाणी सिग्नल न मिळाल्याने गाड्या थांबवाव्या लागत असून त्यामुळे पुढील स्थानकांवर पोहोचायला उशीर होत आहे. बिलासपूर विभागात कनेक्टिव्हिटीचं काम सुरू आहे, तर इतर काही विभागांत तिसरी आणि चौथी मार्गिका टाकण्याचं काम सुरू असल्याने रेल्वेच्या वेगावर परिणाम झाला आहे. त्यामुळे हजरत निझामुद्दीन, झेलम, आझाद हिंद एक्स्प्रेस, पुणे-सांत्रागाची आणि दानापूरसारख्या गाड्या पुण्यात पोहोचायला सात ते आठ तास उशिरा येत आहेत. पुण्यातून गाड्या वेळेवर सुटत असल्या, तरी पुढील मार्गावर होणाऱ्या अडथळ्यांमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.







