पुणे: पुण्यातील जमीन व्यवहार प्रकरणात (Pune Land Scam) उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) यांच्यावर (Ajit Pawar) गंभीर आरोप झाल्यानंतर राज्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली होती. विरोधकांनी पार्थ पवार यांच्या कंपनीकडून अंदाजे 1800 कोटी रुपयांच्या जमीन व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप केला होता. मात्र, या प्रकरणात एक रुपयाचाही आर्थिक व्यवहार झालेला नाही, असा दावा अजित पवार यांनी केला आहे. याबाबतीत आता सरकारने चौकशीची प्रक्रिया सुरू केली आहे.

या सर्व प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आता आक्रमक भूमिका घेतली आहे. आज त्या पुण्यातील मुंढवा येथे त्या वादग्रस्त जमिनीची पाहणी करण्यासाठी आल्या होत्या आणि त्यांना आत जाण्यास नकार देण्यात आला. यामुळे चिडलेल्या अंजली दमानिया यांनी थेट अजित पवारांच्या राजीनाम्याची मागणी केली असून उद्या पत्रकार परिषदेत महत्त्वपूर्ण माहिती देणार असल्याचं त्यांनी सांगितलं.
अंजली दमानिया यांनी सांगितलं की त्यांनी आतापर्यंत प्रत्येक विषयाचा सखोल अभ्यास करूनच भूमिका घेतलेली आहे. या प्रकरणातही जमीन कुठे आहे, तिचं लोकेशन काय आहे, सध्याची परिस्थिती काय आहे याविषयी अधिकाऱ्यांकडून माहिती घेण्यासाठी त्या मुंढव्यात आल्या होत्या. मात्र, परवानगीशिवाय प्रवेश देणार नाही, असं त्यांना सांगण्यात आलं. त्यानंतर त्यांनी बोटॅनिकल गार्डनच्या संचालकाशी संपर्क साधला, परंतु त्यांनी उद्धटपणे उत्तर दिल्याचा आरोप त्यांनी केला.
दमानिया यांनी पुढे म्हणाल्या की मुंढवा जमिनीच्या प्रकरणात समितीचा अहवाल आज दुपारपर्यंत येण्याची शक्यता आहे. बोटॅनिकल गार्डनसाठी संशोधनाच्या उद्देशाने जमीन देण्यात आली होती, परंतु प्रत्यक्षात किती संशोधन होते याची पाहणी करण्यासाठीच त्या गेल्या होत्या. तरीही त्यांना आत प्रवेश देण्यात आला नाही, असा त्यांचा आरोप आहे.
या व्यवहाराबाबत सरकारची परस्परविरोधी भूमिका त्यांनी सांगितली. माहितीप्रमाणे हा व्यवहार रद्द करण्यासाठी 21 कोटी रुपयांची रक्कम देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले, तर नंतर 42 कोटी रुपयांच्या रकमेची चर्चा पुढे आली. मात्र कायद्याने हा व्यवहार ना अजित पवार, ना देवेंद्र फडणवीस, ना पंतप्रधान मोदी रद्द करू शकतात, असंही दमानिया यांनी स्पष्ट केले.
त्या म्हणाल्या की जर सरकारने हा व्यवहार रद्द करण्याचा निर्णय घेतला तर त्या उच्च न्यायालयात याविरोधात आव्हान करतील. सिंचन घोटाळ्याच्या वेळी आरोप झाल्यावर अजित पवारांनी राजीनामा दिला होता, त्याचप्रमाणे या प्रकरणातही त्यांनी नैतिकता जपत तत्काळ राजीनामा द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. आता यावर अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.







